मुंबई : पुढारी वृत्तसेवा, राज्याच्या ज्येष्ठ सनदी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी आय.ए.एस. प्रशिक्षण सुरू असताना बाबरी मशीद पाडण्यात आल्याबद्दल उत्सव साजरा केल्याची कबुली दिल्याने राज्याच्या प्रशासकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Ayodhya Ram Mandir)
एका आय.ए.एस. अधिकाऱ्याने घटनाबाह्य कृतीचे केवळ समर्थनच नव्हे, तर त्याबद्दल उत्सव साजरा करणे अयोग्य असल्याची टीका समाजमाध्यमांवर होऊ लागली आहे. १९९२ च्या बॅच च्या आय.ए.एस. अधिकारी म्हैसकर यांची फेसबुक पोस्ट अशी आहे. जय श्रीराम! जीवनात एक वर्तुळ पूर्ण झाले. कसे? ६ डिसेंबर १९९२ हा दिवस मसुरीत अतिशय थंड होता. १९९२ च्या बॅचचे तेव्हा प्रशिक्षण सुरू होते. अयोध्येत सुरू असलेल्या घडामोडींची माहिती तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचली. अतिशय गुप्त अशी एक बैठक तेव्हा आयोजित करण्यात आली. या बैठकीत केवळ निमंत्रितांनाच प्रवेश होता. माझे नागपूरशी घट्ट संबंध विचारात घेऊन मलाही हे निमंत्रण मिळाले. या बैठकीत काही आय.ए.एस. प्रशिक्षणार्थी जय श्रीरामचा गजर करीत होते. मी पण एक पूर्ण केशरी पेढा खाल्ल्याचे मला आठवते.
अयोध्येत घडलेली ही घटना ही काही तरी अतिशय सकारात्मक, अतिशय शक्तिशाली आणि अतिशय पवित्र कार्याची सुरुवात आहे, हे मला तेव्हाच कळले. आय.ए.एस. प्रशिक्षणार्थीनी पेढे वाटल्याची, एकमेकांना पेढे भरवल्याची ही बातमी फुटली. एकच खळबळ माजली. नोटिसी देण्यात आल्या. अविवेकी धर्माध शक्ती आय. ए. एस. सेवेत घुसखोरी करीत असल्याची टीकाही तेव्हा करण्यात आली. प्रमुख दैनिकांच्या प्रथम पानावर ही बातमीही प्रसिध्द झाली. १९९२ ची आय.ए.एस. तुकडी ही निराशाजनक असल्याची, या तुकडीत भावनेत वाहून जाणारी छोट्या शहरांमधील मुलेमुली असल्याची टीका करण्यात आली. धर्मनिरपेक्षतेचे भवितव्य संकटात असल्याची टीकाही झाली… तरीही ६ डिसेंबर ९२ च्या रात्री गुप्तपणे खाल्लेला हा पेढा काहीतरी शक्तीशाली, सकारात्मक आणि पवित्र प्रवासाची सुरुवात आहे. यावर पक्का विश्वास होता. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एक केसरी पेढा खाल्ला तेव्हा तो ६ डिसेंबरचा क्षण तर आठवतोच आणि ती सकारात्मक, पवित्र आणि शक्तिशाली प्रारंभाची भावनाही जागृत होते, असेही म्हैसकर यांनी म्हटले आहे.