संधिवात आणि परिणाम, जाणून घ्या लक्षणे

संधिवात आणि परिणाम, जाणून घ्या लक्षणे

संधिवाताचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून त्याचे वेळीच व्यवस्थापन हे एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करतात. लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी वेळीच निदान होणे गरजेचे आहे. योग्य उपचार आणि जीवनाचा दर्जा सुधारण्याबाबत १२ ऑक्टोबर जागतिक संधिवात निवारण दिनानिमित्त जागरुकता निर्माण करणे गरजेचे ठरते.

संधिवात हा एक जुनाट स्वयंप्रतिकार रोग आहे. हा विकार उद्भवतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर परिणाम करू लागते. संधिवाताचा सांध्याव्यतिरिक्त इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो. जसे की त्वचा, डोळे, फुफ्फुस, हृदय आणि रक्तवाहिन्या. हात, पाय, मनगट, कोपर, गुडघे आणि घोट्याचे सांधे सर्वात जास्त प्रभावित होतात. संधिवाताच्या प्रमुख लक्षणांपैकी एक म्हणजे सकाळच्या वेळी सांध्यांमध्ये कडकपणा जाणवतो जो एक तासापेक्षा जास्त कालावधीसाठी टिकून राहतो. यामुळे संधिवात असलेल्यांना अंथरुणातून उठणे किंवा त्यांची दैनंदिन कामे करणे अवघड होऊ शकते. सांधेदुखी आणि सूज हीदेखील त्याची सामान्य लक्षणे आहेत. संधिवाताचा केवळ सांध्यावरच परिणाम होत नाही, तर थकवा, ताप आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणेदेखील उद्भवू शकतात.

संधिवातासह (र्‍हुम्याटॉईड आर्थ्रायटिस-आरए) जगताना दैनंदिन जीवनावर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा त्वचा, डोळे आणि फुफ्फुसांशी संबंधित रोग आहे. या रुग्णांनी वेळोवेळी नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. संधिवात एखाद्याच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करतो. सांध्यामधील ताठरपणा, वेदना आणि सूज यामुळे दैनंदिन कामामध्ये आव्हाने येऊ शकतात. दाराची कडी पकडणे, कपडे घालणे, केस विंचरणे, वस्तू धरणे, शर्टाचे बटण लावणे किंवा बुटाची लेस बांधणे अशा हालचाली अत्यंत कठीण होऊन बसतात.

संधिवाताच्या सर्वात हानिकारक प्रभावांपैकी एक म्हणजे त्याचा शारीरिक गतिशीलतेवर होणारा परिणाम. या स्थितीमुळे सांध्याची झीज होऊन लवचिकता कमी होते आणि शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. ज्यामुळे चालणे, पायर्‍या चढणे कठीण होते. अशा व्यक्तींनी बहुतेकदा वॉकर किंवा व्हिलचेअरसारख्या उपकरणांवर अवलंबून राहावे लागते. या व्यतिरिक्त थकवा ही संधिवाताशी संबंधित आणखी एक महत्त्वपूर्ण समस्या आहे. शारीरिक श्रमानंतर लगेच थकल्यासारखे वाटते. ही स्थिती असलेल्या व्यक्तींना थकवा दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतो.

सतत वेदना आणि अस्वस्थता एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे चिंता किंवा नैराश्य वाढते. आरएमुळे चिडचिड, नैराश्य आणि एकटेपणा जाणवतो. अनेकदा निराशा आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते. संधिवाताद्वारे येणार्‍या शारीरिक मर्यादांमुळे एखाद्याच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. कारण, या व्यक्तींना अनेकदा आपल्या आवडते छंद जोपासणे शक्य होत नाही. हा आजार जसजसा वाढत जातो तसतसे संबंधित व्यक्तींना कपडे घालणे, स्वयंपाक करणे किंवा चालणे यासारख्या दैनंदिन क्रियांमध्ये इतरांवर अवलंबून राहावे लागते.

वेळीच निदान आणि उपचार : संधिवाताचे निदान करताना डॉक्टर रुग्णांची लक्षणे तपासतात, शारीरिक तपासणी आणि चाचण्या करतात. सुरुवातीला डॉक्टर रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती करुन घेतात. सांधेदुखी आणि स्नायूंचा कडकपणा यावर लक्ष ठेवतात. थकवा, ताप आणि वजन कमी होणे यासारख्या लक्षणांचा शोध घेतला जातो. शारीरिक तपासणीमध्ये सांध्यावरील सूज, संवेदनशीलता किंवा विकृतींची तपासणी समाविष्ट आहे. सांध्यांचे नुकसान किंवा त्याचे मूल्यांकन करण्यासाठी क्ष-किरणांची शिफारस केली जाऊ शकते. शिवाय, अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय स्कॅनचा सल्ला दिला जातो. त्यानुसार उपचार केले जातात.

logo
Pudhari News
pudhari.news