पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्शदीप सिंग हे नाव तुम्ही ऐकले असेलच. गेल्या महिन्यात झालेल्या आशिया कपमधील पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात त्याने आसिफ अलीचा सोपा झेल सोडला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात त्याला प्रथमच खेळण्याची संधी मिळाली. या सुवर्ण संधीचा फायदा घेत त्याने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला गोल्डन डकवर बाद करत शानदार पुनरागमन केले. त्याने जगातील नंबर १ टी-२० फलंदाज असलेल्या मोहम्मद रिझवानलाही बाद केले. (Arshdeep Singh)
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने बाबर आझमला पायचीत केले. आपल्या दुसऱ्याच षटकात अर्शदीपने मोहम्मद रिझवानला भुवनेश्वरकरवी झेलबाद केले. त्याने १२ चेंडूत ४ धावा केल्या. यावर्षी रिझवानने १८ पैकी ९ डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्याची बाद होणे सामन्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.
पंजाबच्या अर्शदीप सिंगने या सामन्यापूर्वी केवळ १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २० च्या सरासरीने त्याने १९ बळी घेतले. १२ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इकॉनमी ८.१४ आहे. त्याने एकूण ६४ टी-२० सामन्यांमध्ये ७५ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये ३२ धावांत ५ बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या ३ हंगामात त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली.या कामगिरीच्या जोरावर त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले.
हेही वाचा;