पुढारी ऑनलाईन: अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची 28 वर्षांपासून असलेली सत्ता गेली असून विरोधकांचा दणदणीत विजय झाला आहे. यापूर्वी विधानसभा, ग्रामपंचायत निवडणूक आणि आता साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड गटाचा पराभव झाला आहे.
जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवार 25 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं. ही निवडणूक मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई होती. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनीही त्यांना शह देण्यासाठी बाजी पणाला लावली होती. अखेर यात विरोधकांनी बाजी मारली आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः शरद पवारांनी लक्ष घालून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. किरण लहामटे यांच्या माध्यमातून वैभव पिचड यांचा पराभव केला होता. यानंतर आठ दिवसांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही चाळीस वर्षापासून पिचडांची सत्ता असलेल्या राजूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. आता अगस्ती सहकारी साखर कारखाना पिचडांच्या ताब्यातून निसटला आहे.
पिचड पिता पुत्रांना यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना केली होती. तालुक्यातील सर्व शेतकरी आमच्या पाठीशी असून शेतकरी समृद्धी मंडळाचाच विजय होणार असा विश्वास एकेकाळी मधुकर पिचड यांचा उजवा हात समजले जाणारे सीताराम गायकर यांनी सुरुवातीपासूनच व्यक्त करत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच अगस्ती साखर कारखाना निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा सभा घेतली होती.