पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वेगवेगळ्या तीन कार्यक्रमांसाठी पुण्यात येणार आहेत. या दौर्यात ते काही महत्त्वाच्या ठिकाणांनाही भेटी देणार आहेत. ते राष्ट्रीय नेते असल्याने विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसल्याही प्रकारचे लक्ष घालणार नाहीत. मात्र, आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेऊन लढतो, त्यामुळे पोटनिवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवीत असल्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
कोथरूड येथील निवास्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, भाजप कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेतो. बालेकिल्ला आहे म्हणून आम्ही कधीही दुर्लक्ष करीत नाही. मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, ते प्रचारात सहभागी होणार नाहीत.
मनसे कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार आहात का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धूर्त राजकारणी आहेत. कोणत्या वेळी काय करायचे, हे त्यांना ठाऊक आहे. आणखी एक आठवडा आहे. या कालावधीत ते योग्य निर्णय घेतील, असे म्हणत जास्त बोलणे टाळले. कसब्यातील सुजान नागरिक नोटाकडे जाणार नाहीत, असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
फडणवीस अचानक पुण्यात आल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुंबईइतकेच पुणेही महत्त्वाचे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अचानक पुण्याच्या दौर्यात येतात. जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत पोस्टर लागले आहेत. या प्रश्नावर पाटील यांनी यश नाही मिळाले, तर अधूनमधून नाव बदलून बघायचे असते, असा टोलाही लगावला.
छत्रपती संभाजी राजे धर्मवीर आहेत, याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. त्यांनी देश, धर्म आणि संस्कृतीसाठी बलिदान दिले आहे. ते स्वराज्यरक्षक आहेत, हे आम्ही नाकारत नाही. मविआने तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आराखड्यामध्ये शिंदे सरकारने बदल केला नसल्याचेही पाटील यांनी दिली.
मविआचे नेते घरात बसून
भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेते. यामुळेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही भाजपची शहर यंत्रणा, शहरातील नेते, राज्याचे काही नेते काम करीत आहेत. याउलट परिस्थिती महाविकास आघाडीची असून, त्यांचे नेते दिवसभर घरातच बसून असतात, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी लगावला.