पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या इतिहासात अशा जाहिराती कोणत्याही सरकारने केल्या नाहीत. या जाहिरातींचे पैसे कोणी दिले, याची माहिती जनतेला कळायला हवी. अशा प्रकारे सरकारचं हसं करून घेणाऱ्यांना कळलं पाहिजे. कालच्या जाहिरातीचा खर्च कोणी केला त्या हितचिंतकाच नाव आणि त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे सरकारने जाहिर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सरकारच्या जाहिरातीवरून निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "आजची जाहिरात पुर्णपणे बदलली आहे. कालच्या जाहिरातीमध्ये ज्या गोष्टींची चर्चा झाली त्याची दुरूस्ती केली आहे. सारवासारव करण्याचा प्रयत्न आजच्या जाहिरातीच्या निमित्ताने झाला आहे का? असा प्रश्न जनतेला पडलाय. सरकारने कालच्या जाहिरातीबद्दल उपस्थित कलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. कालची जाहिरात एका हितचिंतकाने दिली, असे शिंदे गटातील एक मंत्री सांगतात, असा कोण हितचिंतक आहे? त्याच्याकडे एवढा पैसा कसा आला? हे सरकारने जाहिर करावं. जनतेच पाठबळ आहे अस वाटत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा जाहिराती कोणी केल्या नाहीत. या जाहिरातीचे पैसे कोणी दिले याची माहिती जनतेला कळायला हवी," अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
"ज्यांच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री झालेत, त्याच पक्षाला कालची जाहिरात खोडसाळपणा वाटत आहे. कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी आजची जाहिरात आहे का? अशा प्रकारच सरकारच हसं करून घेणाऱ्यांना कळलं पाहिजे," असं पवार यांनी म्हटलं आहे. सरकारने ठाणे जिल्ह्यातील कीती लोकांना संरक्षण दिले आहे, त्याची यादी आणि त्यांचा हुद्दा सरकारने जाहिर करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.