मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. याकडे आमचे लक्ष असून प्रकरणावरही लवकरात लवकर निकाल जाहीर होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, मराठी माणसाचा पक्ष पळवला असे विधान केले होते. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला. ते म्हणाले, आम्हीही मराठीच आहोत. मग पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठे.? आमच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. निवडणूक आयोगाने योग्य चाचपणी करून हा निर्णय दिला आहे. आमची बाजू त्यांनी खरी मानली. आमच्यासोबत किती ताकद आता आहे, हेदेखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आम्ही कोण काय बोलत आहे, याकडे लक्ष देणार नाही. इतकेच नाही तर कोण काय बोलले यावर बोलायला मी बांधिल नाही.
केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मी कुणाच्याही आरोपांना उत्तर द्यायला बांधिल नाही, असा टोलाही त्यांनी सुळे यांचे नाव न घेता लगावला.संख्या पाहून आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला का, असा सवाल केला असता, अजित पवार यांनी आपल्याला पक्षाच्या सर्वाधिक जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा आहे. तसेच आमच्याकडे बहुसंख्य आमदारही आहेत. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते. पक्ष संघटनेतील बहुसंख्य सदस्यसुद्धा आमच्यासोबत असल्याचे अजित पवार म्हणाले.