मुंबई / पुणे : शुक्रवारचा दिवस अजित पवार यांच्याबद्दलच्या गूढ प्रश्नांनी सुरु झाला आणि प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच तो मावळला. सकाळी मांजरीकडे कार्यक्रमासाठी जात असताना तो कार्यक्रम रद्द करून अजित पवार पुण्यात परतले. पाठोपाठ त्यांचे दोन दिवसातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र तशी अधिकृत घोषणा कुणी केली नाही की कार्यक्रम रद्द करण्याची कारणेही कुणी दिली नाहीत. हा प्रकार नेमका काय आहे याचे गूढ कायम ठेवून दिवस मावळला आणि रात्री पुन्हा अजित पवारांच्यासंदर्भात नव्या चर्चेने जन्म घेतला.
अजित पवारांशी कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. आमदारांची संख्या इतकी कमी कशी इथंपासून तर नॉट रिचेबल होण्याचे कारण काय, असे प्रश्न पडले. पण त्यांची उत्तरे देण्यासाठी मात्र कुणीही उपलब्ध नव्हते. परिणामी अजित पवार यांच्या हालचालींबद्दलचे गूढ कायम राहिले.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. अजित पवार अचानक नॉट रिचेबल होण्यामागे कोविड, नव्या राजकीय समीकरणांसह विविध तर्क लढविले जात आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची भेट, शरद पवार यांनी उद्योगपती अदानी यांची केलेली पाठराखण अशा अनेक घटनांचा संदर्भ जोडण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहेत.