पुढारी ऑनलाईन डेस्क : AIADMK Exit NDA : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला दक्षिणेत मोठा राजकीय धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) साथ सोडली आहे. एआयएडीएमकेचे उपसमन्वयक के. पी. मुनुसामी यांनी सांगितले की, एआयएडीएमकेने बैठकीत एकमताने एक ठराव मंजूर केला. अण्णाद्रमुक आजपासून भाजप आणि एनडीए आघाडीसोबतचे सर्व संबंध तोडत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे राज्यातील नेते गेल्या वर्षभरापासून आमच्या नेत्यांबद्दल आणि कार्यकर्त्यांवर सतत आक्षेपार्ह टीका करत आहेत. भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून आमच्या पक्षाच्या धोरणांवर टीका केली जात आहे. दिवंगत नेते सी एन अन्नादुराई आणि जे जयललिता यांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे पक्षामध्ये तीव्र नाराजी होती, असे मुनुसामी यांनी पक्षाच्या बैठकीतील निर्णयांविषयी बोलताना सांगितले. त्यांचा रोख भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलई यांच्यावर होता. (AIADMK Exit NDA)
एआयएडीएमके मुख्यालयात पक्षप्रमुख पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते के. पी. मुनुसामी म्हणाले की, पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.
भाजपचे प्रदेश नेतृत्व गेल्या वर्षभरापासून सातत्याने आमचे माजी नेते, सरचिटणीस ईपीएस आणि आमच्या कार्यकर्त्यांबद्दल अनावश्यक टिप्पणी करत आहे. एआयएडीएमके पक्ष भाजप आणि एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नईत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.
भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी अन्नामलाई अण्णाद्रमुकशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांची ही सर्व टीका सहन करायची का? असा सवाल करत भाजपसोबत आमची युती नसल्याचे सांगण्यात आले होते. निवडणुकीवेळी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी स्पष्ट केले होते.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी एन अन्नादुराई आणि जयललिता यांच्यावर भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी टीका केली होती. यानंतर अण्णाद्रमुक आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला. पक्षाचे कार्यकर्ते दिवंगत मुख्यमंत्र्यांचा कोणताही अपमान सहन करणार नाहीत, असे डी जयकुमार यांनी म्हटले होते.
भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी अन्नामलाई अण्णाद्रमुकशी युती करू इच्छित नाही. आम्ही आमच्या नेत्यांची ही सर्व टीका सहन करायची का? आम्ही तुम्हाला सोबत का घेऊन? भाजप येथे पाय ठेवू शकत नाही, असे जयकुमार यांनी म्हटले होते.
आम्ही यापुढे आमच्या नेत्यांवर टीका सहन करू शकत नाही. सध्या तरी भाजप आणि अण्णाद्रमक यांच्यात कोणतीही युती नाही. भाजप अण्णाद्रमुकसोबत नाही. याबाबतचा निर्णय निवडणुकीच्या वेळीच घेतला जाईल, अशी ही आमची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.