नागपूर : पुढारी वृत्तसेवा, अहमदनगर या ऐतिहासिक जिल्ह्याचे लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर (Ahilyadevi Nagar) असे नामांतर करण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारला स्मरणपत्र पाठविले जाणार आहे.भाजपा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला असून त्यांच्या इतिहासाचे स्मरण होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु राज्य सरकारने अद्यापही त्याची पूर्तता केली नाही, अशी खंत पडळकर यांनी व्यक्त केली. प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनीही उपप्रश्न विचारून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर केसरकर म्हणाले, नामांतरासाठी कार्यालय, अहमदनगरच्या जिल्हाधिकारी अहमदनगर महानगरपालिका आयुक्त, विभागीय रेल्वे कार्यालय व्यवस्थापक, मुख्य पोस्ट ऑफिस तसेच तहसीलदार, महसूल विभागाला जिल्ह्याची माहिती सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये कळविण्यात आले आहे.
सभागृहाची भावना लक्षात घेऊन या सर्व कार्यालयांना लवकरच स्मरणपत्रे पाठविण्यात येतील. तसेच यासंदर्भात मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे शिफारसपत्र पाठविले जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. केसरकर यांच्या या ग्वाहीमुळे सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके बाजूने अभिनंदन केले.
हेही वाचा