पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जवान' हा बहुप्रतीक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलीच कमाई केलीय. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जवानमधला सान्या मल्होत्राचा अभिनय देखील तितकाच नेत्रदीपक ठरला आहे. शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा समावेश असलेल्या स्टार-स्टड्ड एम्बेबल कास्टमध्ये सान्या मल्होत्राची डॉ. इरामची भूमिका नक्कीच वेगळी ठरते. (Jawan Movie)
सान्या मल्होत्रा एका समर्पित डॉक्टरच्या भूमिकेत आहे, जी सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी धडपडत आहे. ज्या संकटामुळे ६३ निष्पाप मुलांचा मृत्यू होतो. तिच्या पात्राचा प्रवास नाट्यमय वळण घेतो, जेव्हा तिला सरकारकडून अन्यायकारकपणे तुरुंगात टाकले जाते आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप होतो. तिची भूमिका नक्कीच कमाल ठरली आहे.
दिग्दर्शक अॅटलीची ही गोष्ट २०१७ च्या हृदयद्रावक गोरखपूर रूग्णालयातील दुर्घटनेपासून प्रेरणा घेऊन आली असल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार, १० ऑगस्ट २०१७ रोजी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सीजनच्या अभावामुळे इंसेफेलायटिस आजाराने ग्रस्त असलेल्या ५७ मुलांचा मृत्यू झाला होता. ऑक्सीजनच्या अभावामुळे अनेक निष्पाप मुलांच्या मृत्यूसारखी कहाणी चित्रपट "जवान"मध्ये दाखवण्यात आलीय. कफील खान यांनी लिहिलेल्या पुस्तकाशी मिळतीजुळती कहाणी जवानची असल्याचे म्हटले जात आहे.
गोरखपूर रूग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी डॉ. कफील खान यांना निलंबित करण्यात आलं. त्यांच्यासहित अन्य काही जणांना अटक देखील झाली. नऊ महिन्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली होती.
कफील खान सोशल मीडियावर म्हणतात "मी जवान पाहिलेला नाही पण लोक मला मेसेज करत आहेत की त्यांना तुझी आठवण येते. चित्रपट बघताना आणि वास्तविक जीवन यात खूप फरक आहे. लष्करातील गुन्हेगारांना, आरोग्यमंत्री वगैरेंना शिक्षा होते. पण इथे मी आणि ती ८१ कुटुंबे न्यायासाठी भटकत आहेत. सामाजिक समस्या मांडल्याबद्दल @iamsrk सर आणि @Atlee_dir सरांचे धन्यवाद.
कफील खान म्हणाले की, शाहरुख खानचे आभार, ज्यांनी या मुद्द्यावर चित्रपट बनवला.