उत्तुंग व्यक्तिमत्त्व : आचार्य विद्यासागर महाराज

उत्तुंग व्यक्तिमत्त्व : आचार्य विद्यासागर महाराज
Published on
Updated on

संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांनी समाधी घेतली आणि सर्वजण दुःखात बुडून गेलो आहोत. आयुष्य म्हणजे आध्यात्मिकद़ृष्ट्या समृद्ध असे युग आहे, ज्यामध्ये प्रगाढ ज्ञान, अमर्यादित करुणा आणि मानवतेच्या उद्धारासाठीची अतूट वचनबद्धता यांचा समावेश आहे. मला अनेक प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्यामुळेच मला अतीव दुःख होत आहे, माझ्यासह असंख्य आत्म्यांसाठी मार्ग प्रकाशित करणारा एक दीपस्तंभ गमावल्याची तीव्र संवेदना जाणवत आहे.

विद्यासागर महाराज यांचे वात्सल्य, दयाभाव आणि आशीर्वाद हे केवळ चांगुलपणाचे द्योतक नव्हते, तर त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह हा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व भाग्यवंतांच्या जीवनाला एका नवीन प्रेरणा देणारा होता. आचार्य हे नेहमीच ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जातील. ते एक खरे तपस्वी होते, ज्यांचे आयुष्य भगवान महावीर यांच्या आदर्शांनी प्रेरित होते. त्यांचे जीवन जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी कृती आणि शिकवणीतून त्यांचे आदर्श प्रत्यक्ष आचरणात आणले. ते सत्यनिष्ठ जीवन जगले, ज्यातून विचार, उच्चार आणि कृतीबाबतचा जैन धर्मातील प्रामाणिकपणा ठळकपणे दिसून येतो. त्यांचे राहणीमान साधे होते. त्यांच्यासारख्या माहात्म्यांमुळेच या जगाला जैन धर्माचे आचरण आणि भगवान महावीर यांच्या आयुष्याचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळत आहे. सर्व धर्म, पंथ आणि संस्कृतीचे लोक त्यांच्याकडे येत असत आणि आध्यात्मिक जागृतीसाठी विशेषतः युवावर्गामध्ये प्रबोधनासाठी ते अविरत कार्यरत असत.

शिक्षण क्षेत्र त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होते. बालपणातील विद्याधर नावाच्या एका सामान्य मुलापासून ते आचार्य विद्यासागर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांची ज्ञान संपादन करण्याची आणि संपूर्ण समाजाला ज्ञान प्रबोधन करण्याची बांधिलकी दर्शवतो. शिक्षण हा न्यायी आणि प्रबुद्ध समाजाचा पाया आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. लोकांना सक्षम करण्यासाठी आणि जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान हे सर्वतोपरी असल्याचे त्यांनी सांगितले. खर्‍या ज्ञानाचा मार्ग म्हणून स्वअध्ययन आणि आत्म-जागरूकतेचे महत्त्व यावर त्यांचा विशेष भर होता. यासोबतच त्यांनी अनुयायांना सतत शिकण्यासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी विद्यासागर महाराज यांना असे वाटायचे की, आपल्या युवावर्गाला असे शिक्षण मिळाले पाहिजे, ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिक मूल्यांची पाळेमुळे रुजलेली असतील. ते नेहमी म्हणायचे की, आपण आपल्या भूतकाळातील ज्ञानापासून दूर गेलो असल्याने वर्तमानातील पाणीटंचाईसारख्या समस्यांवर उपाय शोधणे शक्य होत नाही. कौशल्यावर आणि नवोन्मेषावर भर देणारे शिक्षण हेच समग्र शिक्षण, अशी त्यांची धारणा होती. भारताच्या भाषिक विविधतेचा त्यांना अभिमान होता आणि त्यांनी युवावर्गाला भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

त्यांनी संस्कृत, प्राकृत आणि हिंदीमधून मोठ्या प्रमाणावर लिखाण केले. एक संत म्हणून त्यांनी गाठलेली उंची आणि तरीही जमिनीवर असलेले त्यांचे पाय याची प्रचिती त्यांच्या महान रचनेमधून येते. त्यांच्या कामांमधून ते वंचितांचा आवाज बनले. आरोग्य क्षेत्रातही विद्यासागर महाराज परिवर्तनकारी होते. अपुर्‍या सोयीसुविधा असलेल्या भागांत त्यांच्याकडून विविध प्रकारचे कार्य केले जात होते. आरोग्याविषयीचा त्यांचा द़ृष्टिकोन व्यापक होता, शारीरिक आरोग्याला त्यांनी आध्यात्मिक निरामयतेची जोड दिली.

मी विशेषत्वाने भावी पिढ्यांना हा आग्रह करेन की, त्यांनी विद्यासागर महाराज यांच्या राष्ट्र उभारणीविषयीच्या बांधिलकीचा सखोल अभ्यास करावा. देशहितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन ते नेहमीच करत असत. ते मतदान प्रक्रियेचे खंदे समर्थक होते; कारण लोकशाहीतील लोकसहभागाची मतदान ही एक अभिव्यक्ती आहे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी निरोगी आणि स्वच्छ राजकारणाचा पुरस्कार केला. धोरणे तयार करताना लोककल्याणाचा विचार केला पाहिजे, असे ते सांगायचे.

जगभरात पर्यावरणावर अनेक संकटे घोंघावत असतानाच्या काळात विद्यासागर यांनी केलेले मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरणार आहे. निसर्गाचा र्‍हास कमीत कमी होईल, अशाप्रकारची जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले. अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेत त्यांनी शेतीला सर्वाधिक महत्त्व दिले. शेती आधुनिक आणि शाश्वत करण्यावर त्यांनी भर दिला. आपल्या भूमीचे सौंदर्य म्हणजे या भूमीने संत-माहात्म्यांना जन्म दिला, ज्यांनी इतरांना प्रकाशाच्या वाटेवर नेऊन एक चांगला समाज घडवला. या संत आणि समाजसुधारकांच्या विलक्षण वारशात विद्यासागर यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग ठरते. त्यांनी केलेले कार्य केवळ वर्तमानकाळ डोळ्यांसमोर न ठेवता भविष्यकाळाचा विचार करूनही केले.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मला छत्तीसगडमधील डोंगरगडमधील चंद्रगिरी जैन मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली. ही भेट विद्यासागर यांच्यासोबत माझी शेवटची भेट ठरेल, असे वाटले नव्हते. त्यांनी माझ्याशी बराच वेळ संवाद साधला, देशसेवेच्या माझ्या प्रयत्नांसाठी आशीर्वाद दिले. देश घेत असलेले नवे वळण आणि जागतिकस्तरावर भारताला मिळत असलेला आदर, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचा आशीर्वाद आत्म्यासाठी चंदनासारखा भासतो. विद्यासागर यांची उणीव तर सर्वांनाच जाणवत राहील. त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही वचनबद्धता व्यक्त करतो. ही त्यांना विनम्र आदरांजली ठरेल, तसेच त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केल्यास राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रकल्याण साधता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news