राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मानोरी येथील अॅड. राजाराम आढाव व पत्नी अॅड. मनिषा आढाव यांचा निर्दयीपणे खून केलेल्या 5 पैकी 4 आरोपी पोलिसांना पकडण्यात यश आले. दरम्यान, फरार आरोपी कृष्णा ऊर्फ बबन सुनिल मोरे याचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. घटनेतील पाचही नराधम पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधितांवर कठोर कारवाईसाठी मागण्यांनी जोर धरला आहे. राहुरीतील अॅड. आढाव दाम्पत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. चित्रपटातील खलनालायकाला लाजवणारे दुष्कृत्य करीत आरोपींनी आढाव दाम्पत्यांचा 5 – 6 तास छळ करून त्यांच्या डोक्यामध्ये प्लास्टीक पिशवी टाकून श्वास गुदमरुन दोघांना ठार मारले. त्यानंतर आरोपींची निर्दयता कमी न होता मृतदेहांना गोण्यामध्ये दगडासह भरून उंबरे (ता.राहुरी) येथे स्मशानभुमीत विहिरीत टाकले. राहुरी पोलिस व स्थानिक गुन्वे अन्वेशनने सायबर विभाग व सीसीटिव्हीचा सुरेख वापर करीत चारचाकी वाहन शोधले होते.
वाहनामुळेच गुन्हेगारांचा शोध होऊन घटनेचा उलगडा झाला. आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे या 4 जणांना घटनेच्या 24 तासातच गजाआड करण्यात आले. यांपैकी फरार बबन ऊर्फ कृष्णा मोरे यास पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता. त्यामध्ये तो अलगद अडकला. पो. नि. संजय ठेंगे यांना सोमवारी सकाळी आरोपी मोरे उंबरे हद्दीत असल्याची माहिती समजली होती. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान, एका रिक्षातून राहुरीकडे निघालेल्या मोरे यास पकडण्यात यश आले.