उच्च शिक्षणात ‘आधार’; ‘ओबीसीं’चा टक्का वाढणार

उच्च शिक्षणात ‘आधार’; ‘ओबीसीं’चा टक्का वाढणार

कोल्हापूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 'स्वाधार' व इतर जमातींच्या विद्यार्थ्यांना 'स्वयम' योजनेंतर्गत 60 हजारांची छात्रवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत 60 हजार रुपयांची छात्रवृत्ती मिळणार आहे. ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटीच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह, भोजन व निवासाचा खर्च भागविता येणार आहे. या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुका, जिल्हा व महानगरांमध्ये शिक्षणासाठी गाव सोडून येतात. सरकारने मोठ्या प्रमाणात वसतिगृहे उभारली नसल्याने त्यांना खासगी रूम करून राहावे लागते. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अनुदान मिळते.

आदिवासींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना स्वयमची छात्रवृत्ती मिळते. ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांनाही छात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 19 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळात योजनेला मंजुरी मिळाली. 13 डिसेंबरला शासन निर्णय झाला आहे.

राज्य सरकारने या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे नाव दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तेनुसार 600 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना 38 ते 60 हजार रुपयापर्यंतची छात्रवृत्ती मिळणार आहे. महानगरात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना 60 हजार, पालिका क्षेत्रासाठी 51 हजार, जिल्ह्याच्या ठिकाणे 43 हजार रुपये तर तालुक्यांच्या प्रत्येक ठिकाणी 38 हजार रुपये विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news