मेक्सिको : जगभरात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. हॅकर्स कधी आपला फोन, बँक खाते आणि तत्सम बाबी हॅक करतील आणि कधी डल्ला मारतील, त्याचा काहीही नेम राहिलेला नाही. अशा परिस्थितीत आपले बँक खाते आणि सर्व आर्थिक बाबी ज्यात जोडल्या गेल्या आहेत, तो फोन सुरक्षित असणे आवश्यक आहे. पण, इंटरनेट प्रणाली आणि ब्लूटूथमुळे हा धोका प्रचंड वाढला आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच इतक्या धोकादायक प्रणालीत सर्वात सुरक्षित फोन कोणता, हा कळीचा मुद्दा होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी काही फोन असेही सुचवले आहेत, जे या मायाजालातदेखील अतिशय सुरक्षित आहेत आणि या फोन्सच्या माध्यमातून फसवणुकीची शक्यता 70 ते 80 टक्क्यांनी कमी होते. अर्थातच, हे फोन आहेत इंटरनेट व ब्लूटूथरहित फोन्स!
मुळात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हॅकर्स आपला फोन हॅक करतात, एखादा मेसेज किंवा एखादी लिंक पाठवतात आणि त्याला क्लिक केले तरी आपले बँक अकाऊंट रिकामे होण्यास वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत सर्वांचा कल सुरक्षित फोन घेण्याकडे असतो. आता सर्वात सुरक्षित फोन हा अव्वल दर्जाचा असेही काहींना वाटेल. पण, प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. कारण, दिल्लीतील सायबर तज्ज्ञांचे असे मत आहे की, हॅकर्स आयवोएस किंवा अँड्रॉईड प्रणालीवर आधारित फोन सहज टार्गेट करू शकतात.
आता एक फोन असाही आहे, जो भारतातच नव्हे तर जगातील कोणत्याही देशात असो, त्याला सायबर गुन्हेगार सहजासहजी लक्ष्य करू शकत नाहीत. हे फोन बाजारात अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. हे फोन म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय असणारे की पॅड फोन आहेत. ज्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, असे फोन सर्वाधिक सुरक्षित असे तज्ज्ञांचा होरा आहे. मात्र, यातही एसएमएस ओटीपीच्या माध्यमातून काही प्रमाणात काळजी घेण्याची गरज असते, असे यात नमूद आहे.