परभणी : अवकाळी पावसाने घरे जमिनदोस्त; फळबागांचीही प्रचंड नासाडी
पूर्णा : पुढारी वृत्तसेवा तालुका परिसरातील शेतशिवारात (गुरुवार) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे गौर, रेगाव, रूपला या गावांसह शिवारातील घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. जोरदार अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी धान्य भिजले. राहती घरे जमिनदोस्त झाली. वादळी वारे आणि पावसामुळे अंबा, लिंबोनी या फळांची गळती झाली. बागा उन्मळून पडल्या. यामुळे शेती, फळबागांसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी मोठी झाडे उपटून पडली. लिमला, माखणी परिसरात गारांचा पाऊस होवून मोठे नुकसान झाले. रेगाव येथे विठ्ठल खैरे यांच्या शेतातील घराचे पत्रे उडून गोठ्यातील गायीला दगडाचा मार लागून ती जागीच दगावली. धान्याची नासाडी झाली. गौर येथे मोठे वृक्ष उपटून पडत वाहतूक खोळंबली, शेतातील कापून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले. कडब्याच्या वळ्ह्या उडून भिजल्या. शेतात ब-याच जणांना जनावरांनाही गारांचा मारा बसला. पाहता पाहता या अवकाळीने होत्याचे नव्हते केले.
रुपला येथे तर सर्वांच्याच घरावरील टिनपत्रे उडून जात घरे उघडी पडली. धान्य व संसारपयोगी जिवनाश्यक वस्तू भिजल्या. गेल्या तिन दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळीवा-यासह हजेरी लावत होता. गुरुवारी मात्र ह्या नैसर्गीक आपत्तीने अक्षरशः हाहाकार उडवला. घरावरील उडून गेलेली पत्रे शोधण्यास शेतक-यांना रात्र घालावी लागली. फळबाग, वाळवणी घातलेली हळदी भिजून मोठे नुकसान झाले. शेतात उभ्या असलेल्या टरबूज व भाजीपाला पिके झोडपून त्याचीही नासाडी झाली. अंबा फळांची मोठ्या प्रमाणात गळती होवून नुकसान झाले.
विद्यूततारा तुटल्या, रोहीत्रही मोडून पडल्याने वीज खंडीत झाली. दरम्यान, या नैसर्गीक आपत्तीची शेतक-यांनी महसूल व कृषी अधिका-यांना नुकसानी पाहणी करून तात्काळ आनूदान देण्याची मागणी केली आहे. परंतू, लोकसभा निवडणूक कामात व्यस्त असलेले अधिकारी शेतक-यांवर कोसळलेल्या नैसर्गीक आपत्तीच्या नुकसानीची दख्खल घेतील काय? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
हेही वाचा ;