पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवले घरच्या भाकरीसोबत | पुढारी

पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवले घरच्या भाकरीसोबत

स्वामी रामेश्वरानंद यांनी आपल्या वर्तनाद्वारे तमाम संसद सदस्यांसमोर आगळा आदर्श ठेवला होता आणि आजही त्या आठवणी जुनेजाणते सांगतात. संयुक्त पंजाबमधील कर्नाल लोकसभा मतदार संघातून ते 1962 मध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडून गेले होते. त्यांची खासियत अशी की, खासदारकीच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी एकदाही लोकसभेतील कँटीनमधून जेवण घेतले नाही.

लोकसभेच्या अधिवेशनासाठी ते स्वतः केलेला डबा सोबत घेऊन जात असत. एवढेच नव्हे तर आपले सारे मानधन त्यांनी संरक्षण दलाच्या सैनिक कल्याण निधीला अर्पण केले होते. एकदा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना इंदिरा गांधी यांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. तेथे मेजवानीचा थाटमाट होता. मात्र, रामेश्वरानंद यांनी जमिनीवर बसून आपला डबा उघडला आणि जेवायला सुरुवात केली. अचानकपणे इंदिरा गांधींचे लक्ष तिकडे गेले. त्या धावतच त्यांच्यापाशी आल्या आणि त्यांना मेजवानीसाठी ठेवलेले पदार्थ घेण्याचा आग्रह केला. रामेश्वरानंद यांनी त्यास ठाम नकार दिला. तोंडी लावण्यासाठी त्यांनी तेथील थोडे लोणचे घेतले. मात्र, त्याचे बिलसुद्धा स्वतःच्या खिशातून दिले. हे कमी म्हणून की काय दिल्लीतील संसद अधिवेशनाला ते आर्य समाज मंदिर परिसरातील आपल्या खोलीतून चालत जायचे.

Back to top button