हिंगोली - मराठा आरक्षणासाठी कुरूंदकरांचे स्मशानात बेमुदत उपोषण
कुरूंदा (हिंगोली) – मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील काही नागरिकांनी थेट स्मशानभूमीत बसून उपोषणास गुरूवारी सकाळी सुरूवात केली. भरपावसात सुरू केलेल्या या बेमुदत उपोषणास ग्रामस्थांनी मोठा पाठींबा दर्शवित स्मशानभूमीत गर्दी केली होती.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यासाठी व त्यांच्या उपोषणास पाठींबा दर्शविण्यासाठी बेमुदत उपोषण सुरु आहे.
गुरूवारी कुरूंदा येथे परबतराव हिरामनराव दळवी, सतीश किसनराव दळवी, गजानन छानय्या इंगोले, चक्रधर गंगाधर दळवी, बबनराव सिताराम दळवी, गोविंद हरीभाऊ दळवी यांनी चक्क गावातील स्मशानभूमीत उपोषणास प्रारंभ केला आहे. यावेळी त्यांना गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा पाठींबा मिळाला आहे. यावेळी एक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.