इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ वर; उद्यापासून बचाव मोहिम थांबणार | पुढारी

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ वर; उद्यापासून बचाव मोहिम थांबणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ झाला आहे. आज (दि.२३) सलग चौथ्या दिवशी ‘एनडीआरएफ’कडून शोधमोहीम राबविण्‍यात आली. आज आणखी दोन मृत्तदेह सापडले. दरम्‍यान, उद्यापासून म्हणजे, सोमवारी (दि. २४) रोजीपासून बचाव मोहिम थांबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी उदय सामंत म्‍हणाले की,  शनिवार दि. २२ जुलै राेजी एनडीआरएफ पथकाला ५ जणांचे मृतदेह सापडले होते. यामुळे एकूण मृतांची संख्या २७ झाली होती. आज आणखी दोन मृत्तदेह सापडले त्‍यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ झाला आहे.

शनिवारी बचाव पथकात एनडीआरएफ पथकासह विविध संस्था व स्वंयसेवक, आपदामित्र असे एकूण ११७५ कार्यकर्ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शोध कार्य करत होते. इर्शाळवाडीत शासनाच्या नोंदीनूसार, ४३ कुटूंबातील २२९ सदस्य होते. त्यातील १२४ जण सुखरुप बचावले आहेत, २७ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत, तर ७८ अद्याप बेपत्ता असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली हाेती.दरम्यान या दुर्घटनेतील २२ जखमी ग्रामस्थांपैकी १८ ग्रामस्थांना उपचार करुन सोडलेले आहे. तर चार जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी एक ग्रामीण रुग्णालय चौक येथे तर अन्य तिघे एमजीएमरुग्णालय नवी मुंबई येथे उपचार घेत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button