Irshalgad landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी शोधकार्य सुरूच | पुढारी

Irshalgad landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी शोधकार्य सुरूच

पुढारी ऑनलाईन डेस्क : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे १९ जुलैच्या रात्री दरड कोसळ्यांने, अनेक माणसे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आज (दि.२३) या घटनेच्या चौथ्या दिवशी देखील एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू ठेवली आहे. शनिवारी ५ जणांचे मृत्यूदेह सापडले होते. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या २७ झाली आहे. दरम्यान, IMD ने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

शनिवारी बचाव पथकात एनडीआरएफ पथकासह विविध संस्था व स्वंयसेवक, आपदामित्र असे एकूण ११७५ कार्यकर्ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शोध कार्य करत होते. इर्शाळवाडीत शासनाच्या नोंदीनूसार ४३ कुटूंबातील २२९ सदस्य होते. त्यातील १२४ जण सुखरुप बचावले आहेत, २७ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत, तर ७८ अद्याप बेपत्ता असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान या दुर्घटनेतील २२ जखमी ग्रामस्थांपैकी १८ ग्रामस्थांना उपचार करुन सोडलेले आहे. तर चार जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी एक ग्रामीण रुग्णालय चौक येथे तर अन्य तिघे एमजीएमरुग्णालय नवी मुंबई येथे उपचार घेत आहेत.

दरम्यान बचावलेल्या १२४ ग्रामस्थांची निवारा व्यवस्था पंचायतन मंदिर नढाळ येथे करण्यात आली आहे. यामध्ये आश्रमशाळेमधील ३१ विद्यार्थी आहेत. तीन दिवसापासून मदत कार्य सुरु असून आतापर्यंत १६ पहिल्या दिवशी ६ दुसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी शनिवारी ५ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून एकूण मृतांचा आकडा २७ वर गेला आहे.

Back to top button