Irshalwadi Landslide :तळीये वाडी ते इर्शाळवाडी - तिच पुनरावृत्ती का झाली? | पुढारी

Irshalwadi Landslide :तळीये वाडी ते इर्शाळवाडी - तिच पुनरावृत्ती का झाली?

रायगड : पुढारी वृत्तसेवा – जे तीन वर्षांपूर्वी महाड येथील तळीये वाडीत घडले, त्याच घटनेची पुनरावृत्ती खालापूर येथील इर्शाळवाडी येथे घडली आहे. (Irshalwadi Landslide) त्यावेळी दुर्घटना समजायला आणि प्रशासकीय मदत पोहोचायला उशीर झाला होता. प्रशासकीय मदत उशिरा गेल्याने मृतांची संख्या वाढली होती. हीच पुनरावृत्ती खालापूर इर्शाळवाडी येथे झाली आहे. (Irshalwadi Landslide)

रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. अलर्ट मिळाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न घेतल्याने नागरिक मृत्यूच्या खाडीत लोटले गेले आहेत. मदतीसाठी नागरिक टाहो फोडीत आहेत. मात्र बचाव यंत्रणांना पोहोचण्यात मोठी अडचण होत असल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्याची स्थिती गंभीर होत आहे.

महाड तळीये ही दुर्घटना २३ जुलै, २०२१ रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनंनंतर २ वर्षांनी इर्शाळवाडीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तळीयेपेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. मात्र डोंगर खाली येण्याची स्थिती सारखीच आहे. या वाडी मध्ये ६० घरे होती. त्यातील ४८ घरे दरडी खाली सापडली आहेत. २२६ रहिवासी या ठिकाणी राहत होती. मध्यरात्री डोंगर कोसळण्याचा आवाज झाला व लोकांची पळापळ सुरू असतानाच प्रचंड डोंगर येऊन घरांवर कोसळला. यामध्ये ४ ते ५ लोक बाहेर येऊ शकले व संपूर्ण वाडीतील दोन घरे बचावली.

आजही ढिगाऱ्याखाली ८० ते ९० लोक अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने चालत हे ठिकाण गाठावे लागत आहे. या सर्वाचा परिणाम बचाव कार्य करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. प्रशासकीय यंत्रणा, आणि मुख्यमंत्री सुद्धा पोहोचले आहेत. मात्र जेसीबी सारख्या यंत्रणा पोहोचत नसल्याने बचावकार्य संथगतीने सुरू आहे. बाहेर जमलेल नातेवाईक आणि वाचलेले काही लोक टाहो फोडीत आहेत. आमच्या माणसांना बाहेर काढा, त्यांना वाचवा अशी त्यांची प्रशासनाला विनंती आहे. सकाळी १० वाजेपर्यंत जेसीबी सारख्या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे आत अडकलेल्याची अवस्था काय आहे, याचा कोणताच अंदाज लावता येत नाही.

 

Back to top button