कोल्हापूर बाजार समिती निवडणूक : आडते व्यापारी गटातून सत्तारूढ आघाडीचे वैभव सावर्डेकर तर विरोधी आघाडीचे नंदकुमार वळंजू विजयी
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज रमणमळा येथील बहुद्देशीय सभागृहात होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या कामाला प्रारंभ झाला. प्रथम मत पेट्या फोडल्यानंतर मतपत्रिका स्वतंत्र करण्यात आल्या, त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Live Update :
- अनुसूचित जाती जमातीमधून नानासो कांबळे विजयी, तर आर्थिक दुर्बल मधून पांडूरंग काशीद विजयी झाले आहेत.
- ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी.
- ग्रामपंचायत मतदार गटातून सत्तारूढ महाविकास आघाडीचे चारही उमेदवार सुमारे ८०० मतांच्या फरकाने आघाडीवर
- आडते व्यापारी गटाचा निकाल पावणेदहा वाजता लागला, त्यात राजश्री शाहू सत्तारूढ आघाडीचे वैभव सावर्डेकर व विरोधी शिव शाही आघाडीचे नंदकुमार वळंजू हे विजयी झाले आहेत.
- पहिला निकाल नऊ वाजता हमाल तोलाइदार गटाचा जाहीर झाला. त्यामध्ये अपक्ष उमेदवार व माजी संचालक बाबुराव खोत हे ६० मतांनी विजयी झाले आहेत.
मतमोजणीसाठी १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ३६ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीत ग्रामपंचायत, व्यापार, अडते गटांची मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ३६ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीत ग्रामपंचायत, व्यापार, अडते गटांची मतमोजणी होत आहे. बाजार समितीत सत्तांतर होणार की सत्ताधारीच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. आ. विनय कोरे यांना काँग्रेस वगळता अन्य पक्षांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे बोलणीही सुरू होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक जागा देण्याचे ठरले पण उमेदवार निवडीचे अधिकार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडे घेतले. त्यामुळे ठाकरे गटातून नाराजी व्यक्त होत होती. चर्चा सुरू असतानाच सत्तारूढ आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या नेत्यांनी चर्चा सुरू केली. शिंदे गटाने देखील सोबत येण्याचे ठरविले. जागा वाटपाबाबत बैठका झाल्या. एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले परण अचानक उद्भव ठाकरे गटाचे पदाधिकारी आघाडीतून बाहेर पडले. त्यामुळे विरोधी आघाडीतील नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत प्रचाराचा धडाका सुरू केला होता.