नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एप्रिल ते जुलै या तिमाहीत प्रत्यक्ष कर वसुलीमध्ये ४० टक्क्यांची भरघोस वाढ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. कंपनी कराच्या तुलनेत प्राप्ती कराच्या वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. कर वसुलीच्या दृष्टीने आयकर विभागाने केलेली सक्ती तसेच करचोरी टाळण्यासाठी योजलेले उपाय यामुळे प्राप्तिकर वसुलीत मोठी वाढ झाली आहे.
एप्रिल ते जुलै दरम्यान झालेली प्रत्यक्ष कराची वसुली ५ लाख कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे सरकारने संपूर्ण आर्थिक वर्षात १४.२ लाख कोटी रुपये इतके प्रत्यक्ष कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. जागतिक तणाव आणि कठोर पतधोरण यामुळे अर्थव्यवस्था काही प्रमाणात अडचणीत आलेली आहे. अशावेळी भरीव करवसुली सरकारला आपल्या योजना राबविण्यास मदत करू शकतात, असे मानले जात आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये घट झाली तरी आता सरकारला फारशी चिंता करण्याचे कारण देखील नाही. वाढीव इंधन दरापासून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्याचा फटका अजूनही सरकारला सहन करावा लागत आहे.
सरत्या तिमाहीत वैयक्तिक आयकराची वसुली ५२ टक्क्यांनी वाढून २.६७ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. कंपनी कराची वसुली २.२२ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. विशेष म्हणजे कंपनी कराच्या तुलनेत प्राप्तीकर वसुली ४५ हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. प्राप्तिकर भरण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली नव्हती. तरीही प्राप्तिकर वसुलीचे आकडे चांगले आले आहेत, हे विशेष.
हेही वाचलंत का ?