संगमनेर पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने फक्त रायगडाचेच शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले आहेत. त्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यापैकी 30 गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम आपण हाती घेतले आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या शहागडाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेमगिरीच्या गडावरूनच केली. राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे संभाजी राजे मेळाव्याच्या निमित्ताने आले होते.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजीराजेम्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात गड जिंकले मात्र त्या किल्ल्यांची सध्या दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे हे महाराजांचे स्मारके किंवा गड किल्ले खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल तर त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणेच राज्य सरकारने रायगडाचे संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने केले त्याचप्रमाणे इतर गड किल्ल्यांचे संवर्धन का होत नाही असा सवाल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जर तुम्हाला दुरवस्था झालेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तेही सांगा आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज नाही.
आम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गड किल्ले फेडरेशन स्थापन केली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील 30 गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. आम्हाला केंद्रसरकारची कुठल्याही प्रकारची अडचण नाही परंतु हे सर्व गड किल्ले राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या ताब्यात आहेत, तरी गडकिल्ले संवर्धनासाठी परवानगी द्यावी. आम्ही वर्षभर हे सर्व गड किल्ले संवर्धन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रांताध्यक्ष गंगाधर काळकुटे संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख सोमनाथ गोडसे प्रवीण कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.