पुणे : राज्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर असून, त्यापैकी 13 नोव्हेंबरअखेर 14 लाख 84 हजार हेक्टरवर म्हणजे सुमारे 28 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही पन्नास टक्क्यांच्या आत असल्याचे चित्र आहे. रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका व करडई पिकाच्या पेरण्या सुरू असून, उगवण झालेली पिके वाढीच्या अवस्थेत असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. त्यातच चालू सप्ताहात झालेला पाऊस रब्बी पिकांना लाभदायक ठरणार आहे.
राज्यात तृणधान्य पिकाखाली एकूण क्षेत्र 30.72 लाख हेक्टर असून, त्यापैकी 9.14 लाख हेक्टरवर तर रब्बी कडधान्ये पिकाखालील क्षेत्र 22.70 लाख हेक्टर असून 5.54 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र 17 लाख 53 हजार 118 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 7 लाख 87 हजार 87 हेक्टरवर (44.90 टक्के) पेरणी पूर्ण झालेली आहे.