शिवाजी शिंदे
पुणे : राज्यात आतापर्यंत 2 हजार 63 तृतीयपंथीयांना शासकीय ओळखपत्रे दिली आहेत. तृतीयपंथीय नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, समाजात त्यांना नावलौकिक मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वयंरोजगार मेळावे, व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या नागरिकांना समाजात ताठ मानेने उभे राहता येईलच; शिवाय त्यांना हक्काचे स्वयंरोजगाराचे साधन मिळणार आहे.
केंद्र शासनाने देशातील विविध राज्यातील तृतीयपंथीयांची नोंद व्हावी, त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्रे मिळावीत तसेच त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राज्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 2 हजार 63 तृतीयपंथीयांना ओळखपत्राबरोबरच प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तसेच अजून ओळखपत्र अगर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरूच आहे.
राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना स्वत:ची ओळख मिळावी यासाठी राज्य शासनाने आणख एक पाऊल उचलले असून स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामध्ये तृतीयपंथीयांना हक्काचे संरक्षण मिळणार आहे. याबरोबरच त्यांना समाजात ताठ मानेने उभे राहता यावे, यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील 36 जिल्ह्यासाठी 13 लाख 50 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.