कोल्हापूर जिल्ह्यातील 58 गावांत भूस्खलन सौम्यीकरण होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील 58 गावांत भूस्खलन सौम्यीकरण होणार
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात दरवर्षी भूस्खलनाचा धोका वाढत आहे. भविष्यात भूस्खलन होऊच नये, झाले तरी त्याची तीव्रता कमी व्हावी. परिणामी, त्यामुळे होणारे नुकसान कमी व्हावे याकरिता जिल्ह्यातील 58 गावांत (एका गावात दोन ठिकाणे आहेत) भूस्खलन सौम्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने मागवले आहेत.

भूस्खलनाचा राज्यातील कोल्हापूरसह अहमदनगर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग व ठाणे या दहा जिल्ह्यांना अधिक धोका आहे. या जिल्ह्यांत भूस्खलन सौम्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्याद्वारे भूस्खलनाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न आहे. याकरिता महसूल आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून या दहा जिल्ह्यांतील भूस्खलन प्रवण क्षेत्राच्या माहितीसह करण्यात येणारी कामे आणि त्याकरिता लागणारा निधी, असा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचे गावनिहाय कामांचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भूस्खलनांच्या घटनेत तब्बल वेगाने वाढ झाली आहे. 2018 मध्ये भूस्खलनाच्या 20 घटना घडल्या होत्या. 2019 मध्ये 42 घटना घडल्या. 2021 मध्ये ही संख्या 89 इतकी होती. 2021 मध्ये सर्वाधिक 31 घटना राधानगरी तालुक्यात झाल्या. शाहूवाडीत 20, भुदरगडमध्ये 11, पन्हाळ्यात 9, करवीर, आजरा, गगनबावड्यात प्रत्येकी 4, कागलमध्ये 3, तर गडहिंग्लज, चंदगड व हातकणंगले तालुक्यात 1 घटना घडली होती. भूस्खलनात 2018 मध्ये एक, 2019 मध्ये एक, तर 2021 मध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. 2022 आणि 2023 मध्ये जिल्ह्यात कमी पाऊस झाला. परिणामी, सुदैवाने भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडल्या नाहीत.

जिल्ह्यात भूस्खलनाचा 58 गावांना धोका

जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका वाढतच आहे. जिल्ह्यात यावर्षी भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांची संख्या 58 वर गेली आहे. 2018 मध्ये भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांची संख्या 17 होती. 2021 मध्ये ही संख्या 42 वर गेली आहे. यावर्षी 58 गावांचा समावेश धोकादायक ठिकाणात करण्यात आला आहे.

देशात कोल्हापूर 147 वा जिल्हा

भूस्खलनाचा धोका असलेल्या देशभरातील जिल्ह्यांची यादी इस्रो लँडस्लाईड अ‍ॅटलास अहवालात प्रसिद्धकरण्यात आली आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा 147 व्या क्रमांकावर आहे.

भूस्खलन का होते ?

डोंगर उतारावरील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा आली, तर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढत गेल्यास जमिनीखालून प्रवाह वाहून जमिनीखालील स्तराचे विभाजन वाढत जाऊन भूस्खलन होऊ शकते. जमिनीचा वापर वाढल्याने नैसर्गिक स्तर कमी होत आहे. विविध कारणांसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना अनेक नैसर्गिक स्रोतांना अडथळे तयार होत असतात. तसेच कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून भूस्खलन होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news