जळगाव : उष्माघाताचा बळी; अमळनेर तालुक्यातील सात्री येथील घटना
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अमळनेर तालुक्यातील सात्री गावात राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सात्री गावात शाम हिरकण भिल (वय ४७) हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. शुक्रवार (दि.१०) रोजी ते शेतात कामावर गेले असताना सायंकाळपर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांची आई व मुलगा यांनी शाम यांचा शोध घेतला. त्यानंतर बोरी नदीच्या काठावरील सोमनाथ पाटील यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या गाडी रस्त्यावर बेशुध्दावस्थेत शाम भिल आढळून आले. त्यांना तत्काळ खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उष्माघातामुळे मयत घोषीत केले. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुकेश साळुंखे करीत आहेत.
हेही वाचा:

