

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भुसावळ येथील खडका चौफुली जवळ पुढे असलेल्या मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे मोटरसायकल्स स्वार ठार झाले आहेत. ट्रकमुळे मोटरसायकल फरफटत गेली. ट्रक व ट्रकचालकाला नशिराबाद येथील टोल नाक्यावर पकडण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील जितू राठोड व प्रकाश ओखा तवर हे गुरुवार, दि. 15 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलने जळगाव कडे निघाले होते. भुसावळ येथील खडका चौफुली जवळ आले असता ट्रक (क्रमांक आर जे 11 जी ए 9903) ने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात जितू व प्रकाश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी ट्रकच्या पुढच्या भागात आल्याने अपघातानंतर काही किलोमीटर पर्यंत मोटरसायकल फरफटत गेली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाली होती. डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी अपघाताची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला दिल्याने टोल नाका येथे ट्रक पकडण्यात आला असून ट्रकचालक श्यामबाबू (राहणार आग्रा) याच्याविरुद्ध रात्री उशिराने बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मृतापैकी एकाचा मोबाईल वाजत असल्याने तो कॉल घेण्यात येऊन संबंधित मृतांची ओळख पटली आहे.