Pakistan Share Market Crash: पीएम मोदींच्या घोषणेनंतर पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये भूकंप
Pakistan Share Market Crash
कराची: काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या राजनैतिक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान शेअर एक्सचेंज (PSX) मध्ये गुरुवारी 24 एप्रिल रोजी मोठी घसरण झाली.
भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम पाकिस्तानी शेअर मार्केटमध्ये तत्काळ दिसून आला.
दिवसाची सुरुवातच मोठ्या घसरणीने झाली आणि कराची-100 निर्देशांक (KSE-100) सुरुवातीच्या पाच मिनिटांत 2 टक्क्यांहून अधिक, म्हणजे तब्बल 2500 अंकांनी घसरून 114740.29 या पातळीवर पोहोचला.
कारवाईच्या सावटाने बाजार अस्थिर
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत निर्देशांक काही प्रमाणात सावरले असले तरी तो 1532.42 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरलेला होता आणि 115693.72 या पातळीवर ट्रेड करत होता. ही घसरण बाजारातील अस्थिरतेचे लक्षण आहे, कारण भविष्यातील आणखी एखाद्या तीव्र कारवाईची भीती अजूनही आहे.
बुधवारीही झाली होती घसरण
ही सलग दुसरी व्यापार सत्रातील घसरण आहे. बुधवारी IMF ने पाकिस्तानचा आर्थिक वर्ष 2025 साठी GDP वाढीचा अंदाज 2.6 टक्के इतका खाली आणल्यानंतर KSE-100 मध्ये 1204 अंकांची घसरण झाली होती. IMF ने हे आर्थिक धोके आणि बाह्य गुंतवणुकीवरील दबाव लक्षात घेऊन केले.
आशियाई विकास बँकेने (ADB) देखील पाकिस्तानचा GDP अंदाज डिसेंबर 2024 मध्ये दिलेल्या 3 टक्के वरून कमी करत 2.5 टक्के केला आहे. हे दोन्ही अंदाज, पाकिस्तान सरकारने FY25 साठी ठेवलेल्या 3.6 टक्के वाढीच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची राजनैतिक प्रतिक्रिया
भारत सरकारने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या माध्यमातून अटारी सीमेवरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील भारतीय नागरिकांना 1 मे पूर्वी भारतात परत यावे, असे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) अंतर्गत दिलेले सर्व व्हिसा रद्द केले असून, 48 तासांत भारत सोडण्याचा आदेश दिला आहे.
भारत व पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयांमध्ये सध्या कार्यरत असलेली 55 कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून 30 वर आणली जाणार आहे. हे बदल 1 मे 2025 पर्यंत लागू करण्यात येणार आहेत.
1960 मध्ये स्वाक्षरी झाल्यापासून प्रथमच सिंधू जलसंधी स्थगित करण्यात आली आहे.
ही कडक कारवाई 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसारण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 26 जणांचा बळी गेला होता.
बैसारणला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात, हे देशी-परदेशी पर्यटकांचे लोकप्रिय स्थळ आहे.

