Nepal - India Border High Alert Issue :
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिंसक आंदोलन होत आहेत. देशातील तरूण पिढी भ्रष्टाचार आणि परिवारवादाविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, नेपाळमधील परिस्थिती पाहून भारतानं देखील नेपाळच्या सीमेवरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलाच्या तुकड्या या सीमा सुरक्षा दलासोबत काम करत असून सशस्त्र सीमा दल हे भारतीय हद्दीत कोणतीही घुसखोरी होऊ नये यासाठी सज्ज झाली आहे.
याबाबत एएनआयला अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'नेपाळमधील परिस्थिती पाहून भारत - नेपाळ बॉर्डरवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. सशस्त्र सीमा दल संपूर्ण परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.'
भारत आणि नेपाळ हे १ हजार ७५१ किलोमीटरची सीमा शेअर करतात. भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे. या सीमेवर बऱ्याच अंशी कोणत्याही बंधनाशिवाय लोकांची आणि सामानांची ये-जा सुरू असते. याबाबतचा शांती आणि मैत्रीचा करार १९५० मध्येच झाला होता.
मात्र आता नेपाळमधील परिस्थिती पाहून सीमेवरील हालचालीवर बारीक लक्ष असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या अनेक सीमांवर नेपाळी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे. मात्र नेपाळमधील भारतीय नागरिकांना देशात परतण्याची परवानगी देण्यात येत आहे. याचबरोबर नेपाळी सुरक्षा दल देखील भारतीय नागरिकांना त्यांच्या देशात येण्यापासून रोखत आहे. मात्र नेपाळी नागरिकांना मायदेशात परतण्याची परवानगी देण्यात येतेय.
पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग जिल्ह्यातील पानीटंकी या भागातील सीमाक्षेत्राजवळ सामानांची वाहतूक करणारे ट्रक रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, एसपी प्रविन प्रकाश यांनी सांगितलं की, 'आम्ही सीमेजवळ पोलीस चौकी तयार केली असून तिथं पोलीस दल देखील तैनात करण्यात आलं आहे. आम्ही हाय अलर्टवर असून परिस्थीतीवर नजर ठेवून आहोत.
नेपाळमधील स्थिती पाहून मंगळवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना गरज नसताना नेपाळमध्ये जाऊ नका असा सल्ला दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, 'भारताचा जवळचा मित्र आणि शेजारी असलेल्या नेपाळमधील उद्भवलेली समस्या ही शांततेच्या मार्गानं आणि चर्चेनं नियंत्रणात आणली जाईल अशी आशा आहे. आम्ही नेपाळमधील काठमांडू आणि इतर शहरात प्रशासनानं लागू केलेल्या कर्फ्यूबाबत देखील माहिती घेत आहोते. नेपाळमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नेपाळी प्रशासनानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे देखील आवाहन भारतीय नागरिकांना केले आहे.'
दरम्यान, नेपाळ आणि भारतादरम्यानची अनेक विमानतळावरची हवाई सेवा स्थगित करण्यात आली आहे.