पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ दरम्यान १९ जणांसह प्रवास करणारे सौर्य एअरलाइन्सचे विमान कोसळले. (Nepal Plane Crash) या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. "आतापर्यंत १५ मृतदेह सापडले आहेत. सौर्य एअरलाइन्सचे एकूण १९ कर्मचारी विमानात होते." अशी माहिती नेपाळ पोलिसांनी X वर पोस्ट करत दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून पायलट बचावला आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
नेपाळमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (दि.२४) सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. हा अपघात सकाळी ११ च्या समुरास झाला. हे विमान पोखराला जात होते. यादरम्यान हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण होते. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
या विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. अपघातानंतर लगेचच विमानाला आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचारी आग विझवण्यासाठी आणि विमानातील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आहेत.