Artemis II Mission
वॉशिंग्टन: मानवी जिद्दीने अथांग अंतराळात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. २१ व्या शतकातील पहिल्या ऐतिहासिक चंद्रमोहिमेवर गेलेले 'आर्टेमिस-२' मधील चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. तब्बल ४,०६,७७८ किमीचा चित्तथरारक प्रवास करून या मोहिमेने मानवी इतिहासात पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाण्याचा विक्रम नोंदवला आहे. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना निर्माण झालेली भीषण उष्णता आणि तांत्रिक आव्हानांवर मात करत, या अंतराळवीरांचे यान पॅसिफिक महासागरात उतरले.
चित्तथरारक पुनरागमन पृथ्वीच्या घनदाट वातावरणात प्रवेश करताना या यानाचा वेग आणि निर्माण झालेली उष्णता कमालीची होती. मात्र, पॅसिफिक महासागराच्या वर जेव्हा पॅराशुट्स उघडली, तेव्हा अवघ्या जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. या मोहिमेच्या यशासह २१ व्या शतकातील चंद्राच्या दिशेने घेतलेली पहिली मानवी झेप यशस्वी ठरली आहे. हे चारही अंतराळवीर या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार बनले असून, त्यांच्या सुरक्षित पुनरागमनाने नासाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
नासाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही 'आर्टेमिस-२' मोहीम केवळ एक प्रवास नव्हती, तर भविष्यातील अंतराळ संशोधनाचा पाया आहे. या मोहिमेच्या यशाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर मानवाचे कायमस्वरूपी वास्तव्य निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
या ऐतिहासिक मोहिमेत कमांडर रीड वाईझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर आणि मिशन स्पेशालिस्ट क्रिस्टीना कोच व जेरेमी हॅन्सन यांचा समावेश होता. 'ओरियन' यानातून प्रवास करणाऱ्या या चमूने ताशी ४०,००० किमीपेक्षा अधिक वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. यावेळी यानाला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. मात्र, ओरियनच्या 'हीट शिल्ड'ने (उष्णता संरक्षक कवच) आपले सामर्थ्य सिद्ध केले. पॅसिफिक महासागरात यान उतरताच नासा आणि अमेरिकन नौदलाच्या बचाव पथकाने तातडीने अंतराळवीरांना बाहेर काढले. १० दिवसांचा हा थरारक प्रवास यशस्वी केल्याचा आनंद या चौघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
यापूर्वीची 'आर्टेमिस-१' ही मोहीम मानवरहित होती, ज्यामध्ये केवळ उपकरणांची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, 'आर्टेमिस-२' मध्ये प्रत्यक्ष अंतराळवीरांनी यानातील जीवनरक्षक प्रणाली, दिशादर्शन आणि अंतराळातील कार्यक्षमता तपासून पाहिली. या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राची कक्षा ओलांडताना तिथल्या पृष्ठभागाची आणि चंद्राच्या क्षितिजावरून उगवणाऱ्या पृथ्वीची अत्यंत सुंदर छायाचित्रे टिपली. तसेच भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक असलेले अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि तांत्रिक तपासण्याही या चमूने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.