

Hormuz Strait US attacks : भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमानच्या आखातात एका व्यापारी जहाजावर (मर्चंट शिप) झालेल्या अमेरिकन लष्करी हल्ल्यात तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. या संभाषणादरम्यान मार्को रुबिओ यांनी जयशंकरांना सांगितले की, "होर्मुझमधील सर्व जहाजांनी अमेरिकन लष्कराच्या आदेशांचे त्वरित पालन केले पाहिजे."
युरोप दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांची रुबिओ यांच्याशी फोनवर चर्चा झाली. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी जयशंकरांना सांगितले की, "सर्व व्यावसायिक जहाजांनी होर्मुझ स्ट्रेटमध्ये (होर्मुझची सामुद्रधुनी) अमेरिकन लष्कराच्या आदेशांचे त्वरित पालन केले पाहिजे." अमेरिकन नाकेबंदीचे उल्लंघन करणे आणि इराणी तेलाची बेकायदेशीर वाहतूक करणे खपवून घेतले जाणार नाही."
८ जून रोजी अमेरिकन लष्कराने पलाऊचा ध्वज असलेले 'मॅरिव्हेक्स' हे तेल टँकर निकामी केले होते, ज्यामध्ये २४ भारतीय खलाशी होते. या सर्व क्रू मेंबर्सची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. १० जून रोजी अमेरिकेने पलाऊचा ध्वज असलेल्या 'सेटेबेलो' या दुसऱ्या टँकरवर हल्ला केला, ज्यातील २४ भारतीय खलाशांपैकी तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी 'जलवीर' या आणखी एका जहाजावर हल्ला झाला, जे गिनी-बिसाऊचा ध्वज असलेले टँकर होते आणि त्यात २० भारतीय नागरिक होते.
या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी व्यावसायिक जहाजांविरोधातील अमेरिकन लष्कराची प्राणघातक कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "आज संध्याकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा झाली. आखातात अमेरिकन नौदलाने केलेल्या ज्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला, त्याबद्दल मी भारताचा तीव्र आक्षेप पुन्हा एकदा नोंदवला. व्यावसायिक जहाजांविरुद्ध (कमर्शियल शिपिंग) अशी प्राणघातक कारवाई कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही."
भारताने शुक्रवारी अमेरिकेचे 'चार्ज डी अफेअर्स' (प्रभारी राजदूत) जेसन मीक्स यांना समन्स बजावले होते. ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन लष्कराने केलेले प्राणघातक हल्ले स्वीकारार्ह नाहीत, असे त्यांना ठणकावून सांगितले होते. या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला बुधवारी रात्रीही पाचारण करण्यात आले होते. 'जलवीर' जहाजावरील हल्ल्यानंतर भारताने म्हटले की, या आठवड्यात ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय क्रू मेंबर्स असलेली तीन व्यावसायिक जहाजे अमेरिकन लष्कराच्या हल्ल्याच्या कचाट्यात आली, ज्यामुळे तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
यापूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांवर ड्रोन हल्ले केल्याचा आरोप केला होता. ही कथित कारवाई पूर्णपणे अमान्य असल्याचे म्हटले होते; तर दुसरीकडे तेहरानने (इराण) हा आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. या आठवड्यात ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या तीन जहाजांवर हल्ले झाले होते. यातील एका हल्ल्यात बुधवारी तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांनी शुक्रवारी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये दावा केला होता की, "भारतीय जहाजे होर्मुझमधून जात असताना त्यांच्यावर काल रात्री करण्यात आलेला (इराणचा) ड्रोन हल्ला पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे."