पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसमध्ये झंझावाती खेळी करत दोन दिवसांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघ अजूनही बार्बाडोसच्या कॅरिबियन बेटावर आहे. हवामान खात्याकडून आता या ठिकाणी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या बरोबरच बार्बाडोसमध्ये या चक्रीवादळामध्ये अधिक गतीने वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे या चक्रीवादळामध्ये भारतीय क्रिकेट संघ अडकला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक विजेता भारतीय संघ बार्बाडोसच्या कॅरिबियन बेटावरून मंगळवारपर्यंत (दि.2) चक्रीवादळामुळे निघण्याची शक्यता नाही. यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या मते, 'बेरील' हे एक मोठे आणि तीव्र श्रेणी चक्रीवादळ आहे. ते 1 जुलै रोजी पहाटे 2 वाजता बार्बाडोसच्या दक्षिणेस धडकले आहे. हे वादळ अंदाजे 180 किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 195 किमी होता.
'बेरील' वादळामुळे बार्बाडोसमध्ये पूर आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वादळ पुढील 12 तासांत पुन्हा 215 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या रोमहर्षक चकमकीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणारा भारतीय क्रिकेट संघ उड्डाण विलंबामुळे कॅरेबियन बेटावर अडकला आहे. ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळाने 1 जुलै रोजी 30 हून अधिक फ्लाइटचे आगमन आणि 29 विमानांचे उड्डान रद्द केले आहे.
'बेरील' चक्रीवादळ कॅरिबियनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वाईट चक्रीवादळ म्हणून ओळखले गेले आहे. बार्बाडोस व्यतिरिक्त ग्रेनेडा, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन बेटांच्या इतर कॅरिबियन बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. केंद्राने म्हटले आहे की, चक्रीवादळ बेरिल सोमवारी बार्बाडोस आणि विंडवर्ड बेटांवर जोरदार वारे, धोकादायक वादळ आणि मुसळधार पावसामुळे पाणी पातळी 3 ते 4 इंच वाढले तर सखल भागात पुराचा धोका निर्माण होईल.
बार्बाडोसमधील वादळातून खेळाडूंसह सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. यासाठी त्याने आपला प्लॅनही बदलला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संधी मिळताच सर्व 70 सदस्यांना आता ब्रिजटाउन, बार्बाडोस येथून चार्टर फ्लाइटद्वारे थेट नवी दिल्लीला आणले जाईल. भारतीय संघ परदेशातून परतल्यावर मुंबई विमानतळावर उतरतो. मात्र, यावेळी सर्व खेळाडू नवी दिल्लीत येणार आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खेळाडू भेट घेणार आहेत.