पुढारी ऑनलाईन डेस्क: बांग्लादेश न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आज (दि.१७) अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. १५ वर्षांच्या राजकीय राजवटीत मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवत ही कारवाई करण्यात आली आहे. अवामी लीगच्या नेत्यांसह 45 इतरांविरुद्ध देखील अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती स्थानिक मीडीयाने दिल्याचे वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिले आहे.
बांगलादेशातील देशव्यापी विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर ऑगस्टमध्ये शेख हसिना यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्या भारताच्या आश्रयात आहेत. दरम्यान बांगलादेशातील न्यायालयाने गुरुवारी (दि.१७) त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने हसीना यांना अटक करून १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत, असे बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी माध्यमांना सांगितले आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्या भारताच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. बांगलादेशातून पळून गेल्यानंतर त्या सार्वजनिकपणे दिसलेल्या नाहीत. त्यांचा शेवटचा अधिकृत ठावठिकाणा भारताची राजधानी नवी दिल्लीजवळील लष्करी हवाई तळावर होता, अशी माहिती समोर आली होती.
AFP वृत्तसंस्थेनुसार, बांग्लादेशातील मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली हसीनाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. हसीना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीत, राजकीय विरोधकांच्या सामूहिक अटकेसह आणि न्यायबाह्य हत्यांसह व्यापक मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या घटना आहेत. "जुलै ते ऑगस्ट २०२४ या काळात बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात नरसंहार, हत्या आणि मानवतेविरुद्ध गुन्हे घडले, यावेळी देशाच्या प्रमुखपदी पंतप्रधान शेख हसीना होत्या", मोहम्मद इस्लाम यांनी म्हटले आहे.