

Axiom Mission 4 shubhanshu shukla ISS
नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ क्षेत्रात आज एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले भारताचे फक्त दुसरे अंतराळवीर बनले आहेत.
1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल 40 वर्षांनी भारताच्या एका नागरिकाने पुन्हा अंतराळात झेप घेतली आहे. या ऐतिहासिक मिशनविषयी 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...
स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटनं आज केनेडी स्पेस सेंटरवरून (Launch Complex 39A) 12.01 वाजता (IST) यशस्वी उड्डाण केलं. हेच ठिकाण आहे जिथून अपोलो-11 मोहिमेसाठी नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेले होते.
फाल्कन-9 मधून Crew Dragon कॅप्सूलने शुभांशु शुक्ला आणि अन्य तीन अंतराळवीरांना घेऊन उड्डाण केलं असून, हे यान 26 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजता (IST) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (ISS) जोडले जाईल.
39 वर्षीय फायटर पायलट आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ISROने या ऐतिहासिक मिशनसाठी निवड केली आहे. ते या मिशनमध्ये मुख्य भारतीय अंतराळवीर आहेत.
ही एक व्यावसायिक अंतराळमोहीम असून, अॅक्सिअम स्पेस (Axiom Space) आणि NASA यांच्या सहकार्याने राबवली जात आहे. मिशनमध्ये एकूण चार सदस्य आहेत – डॉ. पेगी व्हिटसन (मिशन कमांडर), स्लावॉश उझ्नान्स्की-विस्निव्हस्की, टिबॉर कापू आणि शुभांशु शुक्ला.
या 15 दिवसांच्या मिशनमध्ये एकूण 60 वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार असून, त्यापैकी ७ प्रयोग भारतातील संशोधकांनी सुचवले आहेत.
शुभांशु शुक्ला मिशनदरम्यान एका महत्त्वाच्या भारतीय व्हीआयपीशी थेट संवाद साधणार आहेत, जो भारतीयांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.
याआधी हे मिशन 29 मेपासून अनेकदा पुढे ढकललं गेलं होतं. हवामान, तांत्रिक अडचणी आणि ऑक्सिडायझर लीकमुळे उड्डाण वेळोवेळी थांबवण्यात आलं. शेवटी 25 जून हा दिवस निश्चित झाला.
एलॉन मस्कच्या स्पेसएक्सने तयार केलेले फाल्कन-9 हे दोन टप्प्यांचे मीडियम लिफ्ट रॉकेट आहे. याचे पहिले टप्पे पुन्हा वापरण्यायोग्य असून, यामुळे खर्च कमी होतो. आतापर्यंत या रॉकेटनं 16 मानवी मिशन्स पूर्ण केली आहेत.
या अंतराळ मोहिमेसाठी भारताने एक जागा मिळवण्यासाठी 550 कोटी रुपये अॅक्सिअम स्पेसला दिले आहेत. हे भारताच्या जागतिक अंतराळ सहकार्याचे प्रतीक आहे.
या मोहिमेची घोषणा जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यात झाली होती. यामध्ये ISRO आणि NASA यांच्यातील सहकार्याने भारतीय अंतराळवीराला ISS वर पाठवण्याचा निर्णय झाला होता. ही मोहिम "मिशन आकाशगंगा" म्हणूनही ओळखली जाते.