कोहिनूर लुटल्याचे ब्रिटनकडून अखेर मान्य; कोहिनूर, हरिहर मूर्तीसह सारे परत मिळविणार भारत? | पुढारी

कोहिनूर लुटल्याचे ब्रिटनकडून अखेर मान्य; कोहिनूर, हरिहर मूर्तीसह सारे परत मिळविणार भारत?

लंडन; वृत्तसंस्था :  ब्रिटनच्या टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या राजघराण्याशी संबंधित प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या कोहिनूर हिर्‍याबद्दलच्या माहितीत पंजाबचे तत्कालीन महाराजा दिलीप सिंग (घटनेच्या वेळी वय 10) यांना इस्ट इंडिया कंपनीने कोहिनूर हिरा देण्यास भाग पाडले होते, असे नमूद केलेले आहे.

विशेष म्हणजे, हा मजकूर बकिंगहॅम पॅलेस रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या मान्यतेनंतर प्रदर्शनात मांडला गेला आहे. दुसरीकडे वसाहतवादी काळात तत्कालीन ब्रिटिशांनी भारतातून लुटलेल्या कोहिनूरसह अन्य मौल्यवान व प्रतीकात्मक चीजवस्तू पूर्ववत ताब्यात मिळाव्यात म्हणून मोदी सरकारने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.

महाराजा दिलीप सिंग यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर दिला तेव्हा त्यांच्या मातोश्री कंपनीकडून कैद होत्या.
1849 मध्ये इंग्रजांनी दिलीप सिंग यांच्याकडून पंजाबातील लाहोर (सध्या पाकिस्तानात) ताब्यात घेतले होते. लाहोर करारानुसार दिलीप सिंग यांनी कोहिनूर हिरा कंपनीच्या सुपूर्द करावा, अशी अट (आई सुरक्षित हवी असेल तर) घालण्यात आली होती. कोहिनूरवरील एक लघुपटही प्रदर्शनातून दाखवण्यात येत आहे. यात कोहिनूर हिर्‍याचा संपूर्ण इतिहास ग्राफिकच्या माध्यमातून समोर ठेवलेला आहे. त्यात कोहिनूर म्हणजे विजयाचे प्रतीक असे म्हटलेले आहे. गोवळकोंड्याच्या खाणीत सापडलेला भारताचा हा हिरा ब्रिटनने परत भारताच्या ताब्यात द्यावा, असा सूर सतत उमटत असतो, हे येथे महत्त्वाचे!

भारत सर्वांत मोठी अर्थव्यवस्था; पण 45 ट्रिलियन डॉलरची लूट!

भारत हीच जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती; पण 1765 आणि 1938 दरम्यान तत्कालीन ब्रिटनने 45 ट्रिलियन डॉलरची संपत्ती भारतातून लुटली, असा निष्कर्ष अर्थतज्ज्ञ उत्सा पटनायक यांनी 2018 मध्ये केलेल्या आपल्या संशोधनातून काढलेला आहे.

हेही ब्रिटिशांच्या ताब्यात…

अमरावती संगमरवर, महाराजा रणजित सिंग यांचा मुकुट, शाह जमानचा प्याला, तैमूर माणिक आणि हरिहरसह शेकडो देवतांच्या मूर्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ला दिलेले वचन!

अर्थव्यवस्था पूर्ववत समृद्ध करणे आणि भारताच्या समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या कोहिनूरसह अनेक वस्तू ब्रिटनकडून परत मिळविणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च स्वत:ला दिलेले वचन आहे, असे वृत्त भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांच्या हवाल्याने ‘टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केले आहे.

Back to top button