

पुढारी ऑनलाइन डेस्क: सुदानमध्ये आरएसएफ (Rapid Support Forces) आणि सैन्यामध्ये सुरु असलेला सशस्त्र संघर्ष तिसर्या दिवशीही सुरुच राहिला आहे. या संघर्षात आतापर्यंत सुमारे १०० लोक ठार झाले आहेत. तर ११०० हून अधिक जखमी झाले आहेत. संघर्षाची धार वाढत असल्याने मृतांसह जखमींचा आकडा वाढेल, शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही गटांकडून सुदानची राजधानी खार्तूममधील प्रमुख ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ( Sudan clashes )
सुदानमधील संघर्ष देशाच्या लष्करी नेतृत्वातील संघर्षाचा एक भाग आहे, जी प्रतिस्पर्धी गटांमधील हिंसाचारात वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे. रविवारी (दि.१६) जखमींना बाहेर काढण्याची परवानगी देण्यासाठी तात्पुरती युद्धविराम केला होता. स्थानिक डॉक्टरांच्या माहितीनूसार, खार्तूममधील रुग्णालयांमधील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. लढाईमुळे कर्मचारी आणि वैद्यकीय पुरवठा जखमी लोकांपर्यंत पोहचवण्यास अडथळा येत आहे.
रविवारी (दि.१६) आणि सोमवारी (दि.१७) पहाटे, आरएसएफने राजधानी खार्तूममधील राष्ट्रपती राजवाडा आणि शेजारील ओमदुरमन शहर तसेच देशाच्या उत्तरेकडील डार्फर आणि मेरोवे विमानतळाच्या पश्चिमेकडील प्रदेश हा भाग ताब्यात घेण्याचा दावा केला. पण काही वृत्तवाहिनींच्या माहितीनूसार लष्कराने विमानतळावर पुन्हा ताबा मिळवला आहे; पण आरएसएफने राजधानीतील प्रमुख ठिकाणे ताब्यात घेतल्याचे सैन्याने नाकारले आहे.
सुदानची राजधानी खार्तूमच्या रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना भीती व्यक्त केली. खार्तूमचे रहिवासी हुडा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, 'आम्ही भीती आणि दहशतीखाली आहोत. आम्ही घाबरलो आहोत, आवाजाने आणि घर हादरल्यामुळे आम्ही २४ तास झोपलेलो नाही," "मधुमेह असलेल्या वडिलांसाठी पाणी आणि अन्न आणि औषध संपले तर काय करायचं ही काळजी आहे." खार्तूमचे आणखी एक रहिवासी, खोलूद खैर यांनी बीबीसी या वृत्तवाहिनीला सांगितले की, 'रहिवाशांना कुठेही सुरक्षिततेची खात्री देता येत नाही. "सर्व नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परंतु यामुळे प्रत्येकजण सुरक्षित राहिलेला नाही."
आंतरराष्ट्रीय पातळीवर हा संघर्ष कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे. आफ्रिकन युनियनने जाहीर केले आहे की, युद्धविराम वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मौसा फकी महामत (H.E. Moussa Faki Mahamat) यांना पाठवत आहेत. इजिप्शियन राष्ट्राध्यक्षांच्या निवेदनानुसार, इजिप्त आणि दक्षिण सुदाननेही युद्धखोर गटांमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. अरब राज्ये आणि अमेरिकेन नागरी सरकारने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
सुदान डॉक्टरांच्या केंद्रीय समितीने ९७ नागरिक ठार आणि सुरक्षा दलातील डझनभर मृत, तसेच ९४२ लोक जखमी झाल्याची नोंद केली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, गुरुवारपासून (दि.१३) आरएसएफने आपल्या सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली तेव्हापासून देशभरात ८३ हून अधिक लोक मारले गेले आहेत. आणि १,१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या लढाईत किती नागरिकांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही.
मृतांमध्ये यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) चे तीन कर्मचारी आहेत. एका निवेदनात, 'डब्ल्यूएफपी'ने म्हटले आहे की हे भयानक झाले आहे. आणि शनिवारी (दि.१५) तोफगोळ्याच्या हल्ल्यानंतर खार्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या एका विमानाचे नुकसान झाले, त्यामुळे जखमींना, नागरिकांना मदत करण्यास अडथळा होत होता.
संघर्षानंतर सुदानच्या राज्य टेलिव्हिजनने प्रसारण बंद केल्याची नोंद आहे, परंतु प्रोग्रामिंगमध्ये ब्रेक कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा