

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईचे संकट पुन्हा एकदा जगावर घोघांवत असतांना केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीसंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज (दि.२२ ) लोकसभेत निवेदन सादर केले. जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनास्थितीची माहिती यावेळी त्यांनी सभागृहाला दिली. मांडिविया म्हणाले, जगातील ५.८७ लाख दैनंदिन कोरोनाबाधितांच्या तुलनेत भारतात दररोज सरासरी १५३ कोरोनाबाधित आढळत आहेत. जपान, दक्षिण कोरिया,अमेरिका, इटली, फ्रान्स, ग्रीस सारख्या देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू संख्येत वाढ (Corona Update ) नोंदवण्यात आली आहे.
जगभरात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता केंद्राने आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची रॅन्डम आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. नवीन व्हेरियंट वेळीच ओळण्यासाठी राज्यांना 'जीनोम सिक्वेंसिंग'चा सल्ला दिला आहे. आगामी सण तसेच नूतनवर्ष लक्षात घेता राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, भैतिक दुरत्व ठेवण्यासंबंधी जागरूकता आणण्याची गरज आहे. शिवाय बूस्टर डोसचे प्रमाण वाढवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या आवश्यकतेवर मांडविया यांनी भर दिला.
देशात आतापर्यंत २२०.०२ कोटी लसीकरणाचा विक्रम करण्यात आला आहे. ९०% पात्र लोकसंख्येला दोन्ही लसी लावण्यात आल्या आहेत. तर, २२.३५ कोटी नागरिकांना बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय जागतिक स्थितीवर नजर ठेवून आहे. सरकारच्या प्रयत्नामध्ये सर्वांनी सहकार्य करावे. कोरोना महारोगराई अद्याप संपेलली नाही. बूस्टर डोस लावून आपला बचाव करणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधातील सामूहिक लढा सुरु ठेवण्याची आवश्यकत असल्याचे मांडविया म्हणाले.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गुरूवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड मास्क घालून आले. यावेळी त्यांनी खासदारांना मास्क घालण्याचे आवाहन केले. लोकसभेतील भाजप तसेच विरोधी पक्षाने अनेक खासदार देखील मास्क घालून सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले होते.यावेळी लोकसभा अध्यक्षांनी तसेच राज्यसभा सभापतींनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान मास्क घालण्याचे आवाहन खासदारांना केले.
हेही वाचा