कॅनबेरा; वृत्तसंस्था : भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराला ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मंजुरी दिल्याने भारतातून होणाऱ्या मोठ्या निर्यातीला हिरवा कंदील मिळाला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आता चीनवरचे अवलंबित्व कमी करत असून, त्यासाठी भारतासारखा सक्षम पर्याय असलेला मित्र देश मिळाल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुक्त व्यापार करार झाला होता; पण त्यावर ऑस्ट्रेलियन संसदेची मोहर उमटवण्याची महत्त्वाची बाब शिल्लक होती. तेथील संसदेने आता या कराराला मंजुरी दिली आहे. खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेज यांनी हे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र आणि करार मंजूर झाल्याची घोषण त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केली. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी हा करार झाल्याने दोन देशांतील आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत भारताची प्रतिबद्धता दिसून येते, असे म्हटले आहे.
या करारामुळे भारतातून ऑस्ट्रेलियात निर्यात होणाऱ्या सुमारे ६ हजार प्रकारच्या भारतीय वस्तूंना आता ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या जवळपास ९६ टक्के मालावर आता सीमा शुल्क लागणार नाही.