न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : भारतात दारिद्य्र निर्मूलनासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न तसेच पुढाकाराचे संयुक्त राष्ट्र संघाने कौतुक केले आहे. गेल्या 15 वर्षांत भारतातील 41.5 कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाली असून, हा एक ऐतिहासिक बदल भारताने अलीकडच्या काळात साध्य केलेला असल्याचे संयुक्त राष्ट्राने नमूद केले आहे.
2005-06 ते 2019-21 या कालावधीत भारतात गरिबीमध्ये मोठी घट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या 'बहुआयामी दारिद्य्र तालिके'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम' आणि 'ऑक्सफर्ड दारिद्य्र निर्मूलन आणि मानव विकास कार्यक्रमा'अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात वरीलप्रमाणे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाल्याच्या एका जागतिक संस्थेच्या अहवालानंतर सर्व जगासाठी अधिकृत असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालाने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळली आहे. भूक निर्देशांकाचा अहवाल भारताने फेटाळून लावला होता, हेही महत्त्वाचे.
जागतिक भूक निर्देशांकात भारताची 101व्या क्रमांकावरून 107व्या क्रमांकावर घसरण झाल्याचे दाखविण्यात आले होते. आर्थिकद़ृष्ट्या मोडकळीला आलेल्या पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती वाईट असल्याचे या निर्देशांकाने दाखविल्याने त्याचे जगभरात हसेही झाले होते.