

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कीतील अंतल्या येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ( स्टेज 1) (Archery World Cup) ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीने आज ( दि. २२ ) मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी चायनीज तैपेई जोडी चेन यी-ह्सुआन आणि चेन चिह-लून यांचा १५९- १५४ असा पराभव केला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक असून एकुण तिरंदाजी विश्वचषक इतिहासातील मिश्र सांघिक स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले आहे.
ज्योती आणि ओजस यांनी प्रथम ४०-३८ अशी आघाडी घेतली. ओजसने त्याच्या अंतिम बाणाने ९ गुण घेतले. या सामन्यात परफेक्ट १० सह भारताला विश्वविक्रमाच्या समीप गेला होते. अंतिम शॉटमध्ये ओजसने १० गुण घेतले असते तर या जोडीने २०१८ मध्ये दक्षिण कोरियाच्या सो चाओवॉन आणि किम जोन्घो यांनी केलेल्या जागतिक विक्रम मोडला असता.
या स्पर्धेत मिश्र जोडी वेण्णम आणि देवतळे हे प्रथमच एकत्र उतरले होते. सुवर्णपदकावर मोहर उमटविल्यानंतर ओजस देवतळे म्हणाला, "आम्ही विश्वविक्रमाचा विचार केला नव्हता. मी फॉर्ममध्ये शूटिंग करत होतो, मी तो शॉट चुकवला आणि 9 पोस्ट केले.
आम्ही सांघिक स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे आणि आशा आहे की आमची वैयक्तिक कामगिरी आणि उर्वरित वर्ष चांगले राहील, असा विश्वास वेण्णमाने व्यक्त केला आहे.
तुर्कीतील अंतल्या इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अतनु दास, बी धीरज आणि तरुणदीप राय या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारत स्पर्धेच्या पहिल्या टप्यातलं पदक निश्चित केलं आहे. येत्या रविवारी सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारतीय संघाचा सामना चीनशी होणार आहे.
भारतीय पुरुष संघ तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची ही नऊ वर्षांतली पहिलीच वेळ आहे. याआधी १३ वर्षांपूर्वी पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत भारतानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकलं होतं.