

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महासत्ता अमेरिकेच्या (america) इशाऱ्यांना झुगारून रशियाने युक्रेनवर हल्ला केला (Russia Ukraine War). खरे तर अशावेळी भारताला सतर्क होण्याची आवश्यकता आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध जे केले, तेच चीन भारताविरुद्ध (china vs india) करू शकतो, असे म्हटले जात आहे. रशियाचा हल्ला अमेरिकेसह जगातील इतरही देश रोखू शकले नाहीत. यामुळे चीनचा उत्साह वाढू शकतो. वास्तविक नियंत्रण रेषेच्या आजूबाजूचा परिसर काबीज करण्याच्या उद्देशाने चिनी सैन्याने पूर्व लडाखसारखी कारवाई केली तर जगातील कोणताही देश उघडपणे भारताच्या मदतीसाठी पुढे येणार नाही, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.
रशियाचे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत आणि अशावेळी चीनचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. युरोपातील परिस्थिती पाहून त्याने आशियाला धमकावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भारतात राजदूत राहिलेल्या चीनमधील या व्यक्तीने भारताला (china vs india) धमकीच दिली आहे. ली युचेंग हे सध्या चीनचे उपपरराष्ट्र मंत्री आहेत आणि पुढील वर्षी ते चीनचे परराष्ट्र मंत्री बनतील अशी सर्व शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनचे संकट पाहून चीन भारताला धमकावत आहे का?
युक्रेनचे संकट हे आपल्याला आशिया आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आरसा दाखवतो आहे. प्रवाहा विरोधात जावून अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीचे पालन करणे हे समस्येला आणखी वाढवू शकतो. कोणत्याही निर्बंधाशिवाय हे होऊ दिले तर खूप गंभीर परिणाम होतील.
– ली युचेंग, चीनचे उप परराष्ट्र मंत्री
खरे तर गेल्या एक महिन्यापासून रशियन सैन्य युक्रेनवर बॉम्बफेक करत आहे. अमेरिका, युरोपियन युनियनसह जगभरातील देश युक्रेनच्या पाठिशी उभे आहेत. पण, युक्रेनला त्यांच्या सहकार्यातून दिलासा मिळत नाही. अमेरिका स्वतःला जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून वर्णन करतो, पण त्याने निर्बंधांशिवाय रशियासाठी काहीही केले नाही. अशा स्थितीत जगामध्ये त्यांची प्रतिमा कमकुवत देश अशी होत आहे. अशा स्थितीत चीनने युक्रेनचे उदाहरण देऊन आशियाई देशांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे विधान पाहिल्यास ते स्पष्टपणे भारताकडे बोट दाखवत असल्याचे दिसते.
अमेरिकेचे इंडो-पॅसिफिक धोरण आणि क्वाडसारख्या गटांची निर्मिती हे युरोपमध्ये नाटोच्या विस्ताराइतकेच धोकादायक असल्याची धमकी चीनचे उप परराष्ट्र मंत्री ली युचेंग यांनी दिले आहे. अमेरिकेचे धोरण आशियाला नरकात टाकू शकते, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी या गटाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली असतानाच चीनने क्वोडवर टीका केली आहे.
क्वाड गटात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. हा गट इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या प्रभावाला आव्हान देत आहे. सागरी मार्गावरील व्यापार सुलभतेसह शक्ती संतुलित करणे हा देखील त्याचा उद्देश आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. यामुळेच चीनने संधी मिळताच भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.