

निघोज; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील यवत येथील पवार कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींनी निघोज येथील कपिलेश्वर बंधार्याच्या वाहत्या पाण्यात फेकलेल्या मोबाईला शोध लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र टिमने लावला आहे. पुणे पोलिसांकडे हा मोबाईल सुपूर्द करण्यात आला असून, त्यामुळे तपासात मदत होणार आहे. याबद्दल शिवदुर्ग मित्र टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पवार कुटुंबाच्या हत्याकांडातील पुरावे हस्तगत करण्यासाठी पुणे जिल्हा पोलिस पथकाने आरोपींना निघोज येथे आणले होते. आरोपींनी हत्याकांडातील मयत मोहन पवार यांचा मोबाईल निघोज येथील पुष्पावती नदीतील कपिलेश्वर बंधार्यात फेकून दिला होता. या बंधार्यात पंधरा दिवसांपासून काठोकाठ वाहते पाणी सुरू होते.
पाणबुडीच्या साहाय्याने शिवदुर्ग मित्र टिमने मोबाईलचा चार तास शोध घेऊनही तो सापडला नाही. बंधार्यातील सर्व पाणी सोडून देण्यात आल्यानंतर नदीत असलेल्या पाच ते सहा मीटर खोल चिखलात गेलेल्या मोबाईलचा शोध लावत या टिमने तो पुणे पोलिसांकडे सुपूर्द केला. या टिमचे सदस्य राजेंद्र कडू, महेश मसने, अजय शेलार, आकाश मोरे, सुनील गायकवाड यांनी ही शोध मोहीम पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. ही टीम पोलिस विभागाला सामाजिक भावनेतून सहकार्य करतात.