

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : Helicopter crash ooty : हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर गंभीर जखमी जनरल बिपीन रावत शेवटच्या क्षणी 'पाणी पाणी' अशी याचना करत होते; पण त्यांना पाणीच मिळाले नसल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, हेलिकॉप्टर अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत एक माणूस दिसला. तो जिवंत होता आणि पाणी मागत होता. मात्र, दुर्दैवाने आमच्याकडे पाणी नव्हते. काही वेळानंतर समजले की, जखमी व्यक्ती जनरल बिपीन रावत आहेत. त्याचा मला इतका धक्का बसला की, मला रात्रभर झोपच लागली नाही.
देशासाठी अमूल्य योगदान दिलेल्या जनरल रावत यांच्या नशिबी शेवटच्या क्षणी पाणीसुद्धा मिळाले नाही, हे किती दुर्दैवी आहे. जनरल रावत यांना जखमी अवस्थेत अनेक प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. पण त्यांना ते ओळखू शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
कुन्नूरचे रहिवासी असलेले शिवकुमार दुर्घटनेदरम्यान निलगिरी पर्वतावरील चहाच्या बागेत काम करणार्या आपल्या भावाला भेटायला गेले होते. ते म्हणाले, मी आगीच्या लोळाने पेटलेले एक हेलिकॉप्टर कोसळत असल्याची पाहिले.
मात्र, धूर आणि पर्वती क्षेत्र असल्याने घटनास्थळी जाणे कठीण झाले. आगीने लपेटलेले तिघे हेलिकॉप्टमधून खाली पडताना दिसले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघे जण जळालेल्या अवस्थेत हेलिकॉप्टरजवळ पडले होते. ते खूपच जळाले असल्याने त्यांना ओळखणे अवघड झाले. त्यातील एक व्यक्ती जिवंत होती आणि त्यांनी पाणी मागितले.
तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. काही वेळानंतर बचाव टीम एका चादरीत गुंडाळून त्या व्यक्तीला घेऊन गेले. त्यानंतर 3 तासांनंतर त्या व्यक्तीचा फोटो मला दाखवण्यात आला.
मग मला समजले ते जनरल बिपीन रावत होते. माझा विश्वासच बसला नाही. देशासाठी महान कार्य करणार्या रावत यांना अंतिम क्षणी मी पाणी देऊ शकलो नाही, या विचाराने मला रात्रभर झोप लागली नसल्याचे शिवकुमार यांनी भावनाविवश होऊन सांगितले.
घटनास्थळापासून काही अंतरावर राहणारे एस. दास यांनी सांगितले, हेलिकॉप्टर अपघातानंतर तेथील तापमान वाढले होते. काय करावे हे आम्हाला सुचत नव्हते. एक माणूस मदतीसाठी याचना करत होता. त्यानंतर सिलिंडर फुटावे इतका मोठा स्फोट झाला.