गोवा : काँग्रेसच्या उमेदवारीची कोट्यवधी रुपयांना विक्री

गोवा : काँग्रेसच्या उमेदवारीची कोट्यवधी रुपयांना विक्री
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी 30 ते 40 कोटी घेतल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी केला आहे, तो वैफल्यग्रस्तेतून केलेला आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाही. जर आपण एक पैसा जरी प्रवेशासाठी घेतला आहे हे दिनेश सिद्ध करत असतील तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. उलट राव यांनीच 12 उमेदवारांकडून उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोप मुरगावचे भाजपा आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. दिनेश राव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने काँग्रेसच्या आठ आमदारांना प्रत्येकी 30 ते 40 कोटी देऊन विकत घेतल्याचा आरोप केला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दि. 16 रोजी आमोणकर यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.

यावेळी आमोणकर म्हणाले की जो व्यक्ती पक्षाची उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतो त्यालाच दुसर्‍याने पैसे घेतले असे वाटत असावे. दिनेश राव व के सी वेणुगोपाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी 12 काँग्रेस उमेदवारांना काँग्रेसची उमेदवारी देण्यासाठी त्यांच्याकडून करोडो रुपये घेतले होते. इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठीही त्यांनी पैसे घेतले. निवडणुकीच्या काळामध्ये सर्वे करण्यासाठी प्रत्येकी मतदारसंघांमध्ये 50 लाख रुपये आणि मीडिया व्यवस्थापनासाठी एकूण दोनशे कोटी रुपये दिनेश गुंड यांनी लाटले. प्रत्यक्ष सर्वे केला नाही आणि मीडिया व्यवस्थापनाही झाले नाही. आम्ही भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वावर खूश होऊन मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केलेला आहे. कुणीही एक पैसा घेतलेला नाही. काँग्रेसच्या दिनेश राव यांनी आरोप केल्यानुसार पैसे घेतल्याचे सिद्ध करावे आपण स्वतः राजकारण सोडण्यास तयार आहे असे आमोणकर म्हणाले. तोंडाला येईल ते आरोप करण्यापेक्षा पक्षसंघटना बळकट केली असती तर आज काँग्रेसवर ही पाळी आली नसती. अडीच महिने दिनेश राव हे पुन्हा पुन्हा बोलावूनही गोव्यात आले नाहीत, असे आमोणकर यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी दिनेश राव व गिरीश चोडणकर यांच्यावर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केलेला आहे याची त्यांनी आठवण करून दिली.

राहुल गांधी अपरिपक्व राहुल गांधी यांना जबाबदारीचे भान नाही. ते जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. भारत जोडो यात्रा त्यांनी सुरू केली असली तरी त्यांना पक्षाबाबत काहीही काळजी नाही. त्यांना रबर स्टॅम्प अध्यक्ष हवा आहे. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे चांगले व्यक्ती होते, मात्र त्यांचाही वापर रबर स्टँप म्हणून गांधी घराण्याने केला. अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार केला त्याचे खापर मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर फोडले गेले असेही यावेळी आमोणकर म्हणाले. कोळशाबाबतची भूमिका कायम मुरगाव बंदरामध्ये कोळशामुळे प्रदूषण होते. त्या विषयीची आपली जी पूर्वी भूमिका होती ती आताही कायम राहणार आहे. आपण या विषयावर मुख्यमंत्र्याशी बोलणार आहे. कोळसा वाहतूक करणारी कंपनी, एम पी टी बंदराचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून या प्रदूषणावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेनंतर सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news