

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी महिलांचा विकास व त्यांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित राष्ट्रीय सहाय्यक पर्यवेक्षण आराखडा (एनएसएसएफ) विभागीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी ग्रामीण विकास खात्याच्या दीपाली नाईक, संगम पाटील तसेच गोवा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, दमण आणि दीव तसेच महाराष्ट्र येथील अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांना सुमारे ४६८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
गोव्यात दोन क्लस्टर लेव्हल फेडरेशन तयार केल्या आहेत. पुढील पिढ्यांसाठी या क्लस्टरचे काम आदर्श ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ चे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही विकसित गोव्याचे २०२७ पर्यंत हे लक्ष गाठायचे ठरवले आहे. त्यासाठी महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.
राज्यात ३,५३८ महिला बचत गट आहेत. यात ४५ हजारांहून अधिक महिला काम करत आहेत. या बचत गटांना आतापर्यंत १०.३१ कोटी रुपये रिव्हॉल्व्हिंग तर २९ कोटी रुपये समुदाय फंड देण्यात आला आहे. या बचत गटांना ४६८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. २०१४ पूर्वी बचत गटांना एवढे कर्ज मिळणे शक्यच नव्हते. मात्र, २०१४ नंतर बँकांनी नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर महिला बचत गटांना कर्ज देणे सुरू केले आहे. गोवा राज्य लहान असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. गोव्यातील डेअरी, कृषी, फलोत्पादन, मत्स्योद्योग क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. गोव्यातील सर्व १८ क्लस्टर लेव्हल फेडरेशन आदर्श व्हाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.