

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघात आपल्याला सुमारे ६ हजार मते मिळाली होती. मात्र, अलीकडील महापालिका निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवारांना एकूण ८,६७४ मते मिळाली आहेत.
यावरून पणजीतील सुमारे अडीच हजार मतदारांचा पाठिंबा वाढल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन 'आम्ही पणजीकर' पॅनलचे प्रमुख उत्पल मनोहर पर्रीकर यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संध्याकाळी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नीता नाईक व दीपक मापसेकर उपस्थित होते. उत्पल पर्रीकर म्हणाले की, आमचे अनेक उमेदवार नवखे होते आणि त्यांनी यापूर्वी त्या प्रभागांमध्ये काम केलेले नव्हते. प्रभागांचे आरक्षण निश्चित होईपर्यंत उमेदवार ठरवणे शक्य नव्हते.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवीन उमेदवार शोधावे लागले आणि त्यांना उमेदवारी देऊन प्रचारासाठी अवघे पंधरा दिवसच मिळाले. या अल्प कालावधीतही पणजीतील नागरिकांनी नव्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद दिला.
जे उमेदवार विजयी झाले आहेत ते अनेक वर्षांपासून त्या प्रभागांमध्ये कार्यरत होते, तरीही आमच्या उमेदवारांनी त्यांना चांगली लढत दिली, असे पर्रीकर यांनी सांगितले. आमच्या सुमारे दहा उमेदवारांचा पराभव शंभरपेक्षा कमी मतांच्या फरकाने झाला असून, त्यापैकी तीन उमेदवार केवळ तीस मतांच्या फरकाने पराभूत झाले.
जर प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला असता तर निकालात निश्चितच बदल झाला असता, असेही त्यांनी नमूद केले. या सर्व उणिवा विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर करून पुढील निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार
दरम्यान, ज्यांनी आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले तसेच विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केले.