

सांगे : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यातील मीराबाग-सावर्डे येथे झुआरी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधारा आणि पंपिंग स्टेशन प्रकल्पावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती आणि संभाव्य विस्थापनाच्या मुद्द्यावरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, आता या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त सांगेतील संगमेश्वर तिरी जागृती करून बंधाऱ्याला विरोध दर्शविला. या प्रकल्पाबाबत सरकारकडून दिली जाणारी माहिती आणि आकडेवारी संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूंकडे लक्ष वेधताना आंदोलकांनी सांगितले की, या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ही एका मोठ्या धरणाएवढी असून, सरकार याच्या परिणामांबाबत वस्तुस्थिती लपवत आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे संकेत भंडारी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करताना सांगितले की, या प्रकल्पाची एमएलडी क्षमता वारंवार बदलली जात आहे. सुरुवातीला कमी क्षमतेचा वाटणारा हा प्रकल्प आता ६० एमएलडीपर्यंत कसा पोहोचला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी कागदपत्रांमध्ये नमूद असलेली साठवण क्षमता पाहता, हा केवळ साधा बंधारा नसून एक मोठे धरण असल्याचे चित्र उभे राहत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठवल्यास स्थानिक गावे, शेती आणि घरे पाण्याखाली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांनी असाही आरोप केला की, हा प्रकल्प लोकहितापेक्षा विशिष्ट व्यवसायांना किंवा खाणींना पाणी पुरवण्यासाठी आखला जात आहे का, याचा खुलासा सरकारने करावा.
आम्ही शांतताप्रिय मागनि आमचा हक्क मागत आहोत, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि प्रकल्पाचे नेमके स्वरूप स्पष्ट न करता सरकार कामाचा रेटा लावत असल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. जोपर्यंत सर्व शंकांचे निरसन होत नाही आणि प्रकल्प रद्द केला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. यावेळी रामा काणकोणकर, संकेत भंडारी, आपा नाईक, नगरसेवक मॅश्यू डिकॉस्टा उपस्थित होते.